हरिणाचा शोध सुरु : शेळ्या चारणाऱ्या महिलेने दिले जीवदानपोहरा बंदी : हरणाच्या कळपातून ताटातूट झाल्यानंतर पाच दिवसांच्या पाडसाला (हरिणाचे पिलू) एका शेळी चारणाऱ्या महिलेच्या समयचुकतेने सोमवारी जीवदान मिळाले. पाडस वनकर्मचाऱ्यांच्या ताब्यात असून त्याची पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत देखरख केली जात आहे.प्राप्त माहितीनुसार, पोहरा वन वर्तुळातंर्गत येणाऱ्या पिंपळखुटा बिटमध्ये पाच दिवसांचे पाडस हे हरिणाच्या कळपातून भटकले. पिंपळखुटा येथील शेळ्या चारणाऱ्या राधाबाई मेश्राम यांना हे पाडस शेळ्यांच्या कळपात दिसून आले. छोटे पिलू असल्याने ते शेळी नाही हे लक्षात येताच त्याला आश्रय देण्यात आला. राधाबाई मेश्राम यांनी गावकऱ्यांच्या मदतीने ही बाब वनकर्मचाऱ्यांना कळविली. त्यानंतर पोहऱ्याचे वनपाल विनादे कोहळे, वनरक्षक व्ही. बी. देशमुख, एम. सी. ठाकूर, अरुण महाजन हे घटनास्थळी पोहचले. पाडस हे सुखरुप असल्याचे वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर सदर पाडस हे पोहरा येथील विश्रामगृहात आणण्यात आले. वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांच्या मार्गदर्शनात पाडसाला दुध पाजून त्याची पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे. पाडस हे पाच दिवसाचे असून ते सध्या धावू शकत नाही. त्यामुळे कोणत्या हरणाच्या कळपातून हे पाडस भटकले याचा शोध घेतला जात आहे. पोहरा वनवर्तुळात मोठ्या प्रमाणात हरिणाचे कळप आहेत. वनकर्मचाऱ्यांनी हरिणापासून विभक्त झालेल्या पाडसाला त्याची आई मिळावी, यासाठी हरिणांच्या कळपाचा युद्धस्तरावर शोध सुरू केला आहे. पाडस कळपातून दूर झाल्यामुळे ते शिकारी अथवा कुत्र्याच्या तावडीत सापडले नाही. अन्यथा या पाडसाला कुत्र्यांनी लचके तोडून ठार मारले असते. परंतु शेळ्या चारणाऱ्या महिलेच्या समयसुचकतेने पाच दिवसाच्या पाडसला जीवदान मिळाले आहे, हे विशेष. (वार्ताहर)
पाच दिवसांचा पाडस वनकर्मचाऱ्यांच्या ताब्यात
By admin | Updated: September 6, 2016 00:13 IST