गौरी, गणपती उत्सवाचा परिणामलोकमत विशेषअमरावती : मुंबई, पुणे, हावडा, दिल्लीमार्गे ये-जा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये सध्या आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. आरक्षण खिडक्यावर ‘नो रुम’चे फलक लागलेले आहेत. गौरी, गणपती उत्सवासाठी आलेल्यांना परतीच्या प्रवासाचे तिकीट कोठून मिळवावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.हल्ली सण, उत्सवाचे दिवस असल्याने बाहेरगावी नोकरी, व्यवसायानिमित्त असलेल्यांनी घर गाठले आहे. गणरायाचे १० दिवस घरी कुुटुंबीयांसह घालविल्यानंतर पुन्हा परतीच्या प्रवासाचे नियोजन आखत असताना रेल्वेचे आरक्षण मिळत नसल्याचे वास्तव आहे. मुंबई, पुणे करिता असलेल्या गाड्यांमध्ये ‘नो रुम’ झळकत असल्याने काहींनी दलालांसोबत संपर्क साधून आरक्षण मिळविण्यासाठी धावपळ सुरु केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांनी गौरी, गणपती उत्सवाचे औचित्य साधून तिकिटाचे बुकिंग करून ठेवले आहे. बुकिंग केलेल्या या तिकीट चढ्या दरात विकण्याचा सपाटा चालविला आहे. हावडा, दिल्लीकडे ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्यांची हीच स्थिती असल्याचे दिसून येते. नागपूर- पुणे गरीब रथ, हावडा- पुणे एक्सप्रेस, अमरावती- मुंबई एक्सप्रेस, गोंदिया- मुंबई विदर्भ एक्सप्रेस, मुंबई - हावडा मेल, हावडा-कुर्ला एक्सप्रेस, भुसावळ- निझामुद्दिन गोंडवाना एक्सप्रेस, कोल्हापूर- गोदिंया एक्सप्रेस आदी गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नसल्याचे चित्र आहे. पुण्यासाठी ट्रॅव्हर्सचे भाडे दुप्पटपुणे येथून अमरावतीत गौरी, गणपती उत्सवासाठी मोठ्या संख्यने अनेक जण कुटुंबीयांसह आले आहेत. परंतु परतीच्या प्रवासाचे रेल्वे आरक्षण मिळत नसल्याने नागरिक ट्रॅव्हर्सने जाणे पसंत करीत आहेत. एरव्ही ७०० ते ८०० रुपये पुण्यासाठी ट्रॅव्हल्सचे तिकीट दर असताना आता हे भाडे १५०० ते दोन हजार रुपयांवर पोहोचले आहे. भाडे दुप्पट-तिप्पट आकारले जात असताना प्रवाशांना नाईलाजाने आगाऊ रक्कम देऊन तिकीट घेण्याचा प्रसंग ओढवत आहे.सण उत्सवामुळे रेल्वे गाड्यांत गर्दी वाढली आहे. आरक्षणाची स्थिती गंभीर आहे. काहींनी यापूर्वीच आरक्षण करून ठेवले असून सप्टेंबर महिन्यात हीच परिस्थिती कायम राहील.- व्ही. डी. कुंभारे,वाणिज्य निरीक्षक, अमरावती रेल्वे.
रेल्वे गाड्यांत आरक्षण मिळेना
By admin | Updated: September 20, 2015 23:58 IST