पान ३
कावली वसाड : गतवर्षी सरासरी पावसाळा झाल्यामुळे प्रत्येकाच्या विहिरीतील पाण्याची पातळी वाढली. परिणामी, शेतकऱ्यांनी भुईमूग व तीळ पिकांची पेरणी केली. मात्र, वन्यप्राण्यांचा त्रास वाढल्याने २४ तास पिकाची रखवाली करण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्याय उरलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्र शेतातच काढावी लागत आहे.
यावर्षी शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. हरभरा आता कापणीवर आला. पण जंगली वराह, रोही, हरिण हे वन्यप्राणी शेतात धुमाकुळ घालत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी शेताला काटेरी कुंपणासोबतच तारेचे कंपाउंडसुद्धा केले आहेत. परंतु त्या कुंपणावरून उडी घेऊन नीलगाय व हरिण, वानरांचा कळप शेतात शिरकाव करीत आहेत. रानडुकराच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांना गंभीर दुखापतीला सामोरे जात असताना वनविभागाचे हे मौन संतापात भर टाकणारे ठरत आहे.