अमरावती: शेतकऱ्यांच्या विविध न्यायिक मागण्या तातडीने सोडविण्यात याव्यात अशी मागणी गुरुवार ४ फेब्रुवारी रोजी लढा संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना रात्रीचा वीजपुरवठा मिळत असल्याने अनेक शेतकरी सर्पदंश,वन्यप्राण्यांचा प्राणघातक हल्ला, विजेचा शाॅक अशा अनेक कारणाने मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, शेतकऱ्यांना अस्मानी तसेच सुल्तानी आपत्तीचा सतत सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक वेळा शेती पिकलीच नाही आणि पिकली तर योग्य भावात शेतमाल विकल्या जात नाही.अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना येणारी संपूर्ण विजेची देयके माफ करण्यात यावी, केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे राज्य सरकारने लागू करू नये आदी मागण्या तातडीने साेडविण्याची मागणी लढा संघटनेने केली आहे. याबाबत त्वरित निर्णय न घेतल्यास मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीजवळ १५ फेब्रुवारीपासून शेतकऱ्यासह उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी लढा संघटनेने अध्यक्ष संजय देशमुख, झेडपी सदस्या गौरी देशमुख,कांचन कारमोरे,तेजल कारमोरे,मुरली मदनकर,अरविंद केचे, प्रवीण केने,योगेश भुसारी,सुधीर वानखडे, जाकीर पठाण,रवींद्र तसरे,अमोल साबळे,विनोद धस्कट,दत्ता धस्कट,रोशन गवळी, पिंटू बेलसरे, मारोती निमकर,अभय लांजेवार,प्रवीण ठाकरे,दिनेश ठाकरे, प्रफुल्ल खारकर, अविनाश गोडबोले,भूषण खडतकर, अनिकेत माटे,धीरज खडतकर,अशोक पांडे,वैभव निंभोरकर आदी उपस्थित होते.