परतवाडा : अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषिकर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडून नाहक त्रास दिला जात आहे. शासनाने पीक कर्जमाफी केली असली तरी त्यासाठी शेतकऱ्यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. कर्जासाठी विविध दाखले आणि कारणे दाखवून कर्जप्रकरणे नामंजूर केली जात आहेत.
काही शेतकऱ्यानी यासंदर्भात गुरुवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी दखल घेत संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्रुटी व अडचणी दूर करून शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याची मागणी केली. १६० शेतकऱ्यांचे कर्जप्रस्ताव पोस्टाने परत पाठवून ती प्रकरणे नामंजूर करण्यात आली. त्यामध्ये अचलपूर तालुक्यातील रासेगाव, गौरखेडा, मल्हारा वडगाव फत्तेपूर, येवता आदी गावांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. परतवाडा शहरातील बाजार समितीसमोरील एसबीआयच्या कृषी शाखेत हा प्रकार घडला.
कोट
कर्जप्रकरणासाठी आवश्यक दस्तावेज असलेल्या शेतकऱ्यांना बँकेकडून त्रास दिला जात नाही. रद्द करण्यात आलेली प्रकरणे तात्काळ तपासून त्यावर निर्णय घेतला जाईल.
मो. इकबाल हुसैन, शाखा व्यवस्थापक, एसबीआय कृषी विकास शाखा, परतवाडा