संततधार: जनजीवन विस्कळीत, मेळघाटात धुवांधारअमरावती : सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप मंगळवारीही दिवसभर सुरूच होती. मंगळवारी सायंकाळ होता होता पावसाचा वेग वाढू लागला. हा पाऊस चराचरांना सुखावणारा असून या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कोमेजलेल्या चेहऱ्यांवर पुन्हा आशा पल्लवीत झाल्या आहेत. मेळघाटात अनेक ठिकाणी पावसामुळे वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती आहे. दीड महिना विलंबाने जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला. गेल्या आठवड्यात दोन दिवस पावसाने हजेरी लावल्यानंतर रखडलेल्या पेरण्यांना वेग आला. आता सोमवार, मंगळवारी संततधार पाऊस पेरण्यांना नवसंजीवनी देणारा ठरला आहे. ग्रामीण भागात या सुखावह पावसामुळे हर्षोल्हासाचे वातावरण आहे. शहरातील रस्ते संततधार पावसामुळे ओस पडले आहेत. जिल्हाभरात मंगळवारी समाधानकारक पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात सातत्याने पाऊस कोसळत असून मेळघाटसह विदर्भाच्या नंदनवनात मात्र मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहेत. मेळघाटमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसामुुळे वृक्ष उन्मळून पडले तर अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
शेतकरी सुखावला
By admin | Updated: July 22, 2014 23:45 IST