धोका पत्करून धरणाच्या भिंतीवर चढणारे अधिक
अनिल कडू
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील प्रकल्पावर पर्यटकांसह हौशी मंडळींनी एकच गर्दी केली आहे. तीन दिवसांपासून ही गर्दी बघायला मिळत आहे. यात अनेक मंडळी धोका पत्करून धरणाची भिंत चढून धरणावर पोहोचत आहेत. काही महाभाग मिळेल त्या रस्त्याने आपली मोटरसायकल धरणाच्या भिंतीवर चढवित आहेत. काहीं तर भिंत चढून धरणाच्या आतील भागात पाण्यापर्यंत पोहोचत आहेत.
सपन प्रकल्पाचे चार दरवाजे २२ जुलैपासून उघडले गेले. धरण ६८ टक्के भरले आहे. धरणाच्या दरवाजातून विसर्गामुळे बाहेर पडणारे पाणी व धरण परिसरातील मनमोहक नैसर्गिक सौंदर्य बघण्याकरिता मागील तीन दिवसांपासून दररोज शेकडो लोक धरणावर पोहोचत आहेत. यात धरण परिसराला जत्रेचे स्वरूप आले आहे. गरमागरम भाजलेले मक्याचे कणीस यात अधिकच भर घालत आहे.
अचलपूर तालुक्यातील हे धरण परतवाडा शहरापासून अगदी जवळ आणि मुख्य रस्त्यावर आहे. त्यामुळे प्रत्येक जण धरणावर जाण्याचा आणि तेथील दृश्य बघण्याच्या बेत आखत आहेत. चारचाकी वाहनांसह दुचाकीच्या लांबच्या लांब रांगा त्या परिसरात लागत आहेत. काही जण जेवणाच्या डब्यासह खाण्याचे पदार्थ सोबत घेऊन येतात. धरण परिसरातील हिरवळीवर बसून या खाद्यपदार्थांचा मनसोक्त आनंदही ते घेत आहेत.
सपन धरण व्यवस्थापनाकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे धोका पत्करणाऱ्या हौशी लोकांना आवरणारेही त्या ठिकाणी कोणी नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने धरण व्यवस्थापकांनी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी पर्यटकांकडून केल्या जात आहे.
(दि.25/7/21 फोटो दोन/ धोका पत्करून भिंतीवर चढतांना हौशी लोक आणि वाहनाच्या लागलेल्या लांबच लांब रांगा)