फोटो : पी १८ अंजनगाव दुकान
अंजनगाव सुर्जी : एक वर्षापासून सर्वत्र सुरू असलेला कोरोनाचा कहर पाहता, शहर व ग्रामीण भागातील जनता ही त्रस्त झाली आहे. गतवर्षी मार्च महिन्यात लागलेले लॉकडाऊन हे सतत पाच ते सहा महिने कायम राहिले. परंतु, त्याच धर्तीवर पुन्हा यावर्षी मार्च महिन्यामध्ये कोरोनाचा कहर सुरू झाला. यात स्वतः जनतेने कोरोनावर मात करण्यासाठी सहकार्य केले. मात्र, प्रशासनातील अधिकारी कोरोनाच्या नावावर आपली पोळी भाजण्याचा प्रकार करीत असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील पान अटाई भागातील मुख्य चौकामध्ये प्रशासनातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या आदेशाने नगर परिषदेकडून रस्त्याच्या मधोमध २० फूट भाग मोकळा सोडून, आजूबाजूने परिसरात कोणतेही रहदारीचे ठिकाण नसताना, केवळ देयके काढण्याच्या दृष्टीने बॅरिकेडिंग करण्यात आले. यादरम्यान तहसीलदारांनी आम्हाला असे करण्याचे सूचित केले असल्याचे मुख्यधिकारी सुमेध अलोने यांनी सांगितले.
दरम्यान, चुकीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅरिकेटिंगबाबत मला माहिती नाही, मात्र, मी ते स्वतः बघून घेतो, असे तहसीलदार जगताप यांनी कळविले होते. तथापि, दहा दिवस झाले तरी बॅरिकेडिंग ‘जैसे थे’ आहे.