चांदूर बाजार : कोरोनामुळे यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या असून, एप्रिल व मे महिन्यात परीक्षा होणार आहेत. तीन महिन्यांवर बारावी व दहावीची बोर्ड परीक्षा आली असल्याने या कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे.
कोरोनामुळे यंदा शैक्षणिक क्षेत्रही प्रभावित झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले, तर आता कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने २३ नोव्हेंबरपासून दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाले होते. कोरोनामुळे यंदा अभ्यासक्रमसुद्धा कमी करण्यात आला आहे. शिक्षण विभागातर्फे दरवर्षी अभ्यासक्रम पूर्ण व्हायला साधारणत: दहा महिन्यांचा कालावधी दिला जात होता. मात्र, यंदा कोरोनामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावित झाली आहे.
नोव्हेंबर शेवटच्या आठवड्यापासून काही प्रमाणात खाजगी वर्ग सुरू झाल्याने दहा महिन्यांचा अभ्यासक्रम सहा महिन्यांत पूर्ण कसा होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे. यंदा कोरोनामुळे दहावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला आहे. लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन पद्धतीने शिकवण्यात आले. गणित व विज्ञान हे विषय ऑनलाइन पद्धतीने समजून घेणे कठीणच आहे. त्यामुळे उरलेल्या कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत शिक्षकांसह विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. यंदा कोरोनामुळे दहावी व बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला गेला आहे.
शिक्षक, विद्यार्थ्यांची कसरत
अभ्यासक्रम पूर्ण व्हायला साधारणत: आठ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. मात्र, शिक्षकांना नोव्हेंबर ते एप्रिल अशा सहा महिन्यांत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांची चांगलीच कसरत होणार आहे. अनेक शाळांनी ऑनलाइन शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऑनलाइन शिक्षण प्रणाली नवीन असल्याने विद्यार्थ्यांना हे शिक्षण पचनी पडले नाही. या शिक्षणात पालकांचा खिशाला चांगलीच कात्री लागल्याने आपला पाल्य शिकत असल्याचे केवळ समाधान पालक वर्गातर्फे व्यक्त केले जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षण अधिक सोपे जात असल्याने आता खऱ्या अर्थाने शिक्षणाला सुरुवात होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांसह पालक वर्ग व्यक्त करीत आहे. मात्र, १० महिन्यांत मिळणारे शिक्षण सहा महिन्यांत कसे पूर्ण करावे, अशी चिंतासुद्धा शिक्षकांसह विद्यार्थी व पालकांना लागली आहे.
--------------