ई-क्लास जमिनीचा वापर अनेक वर्षांपासून गायरानासाठी केला जात आहे. रविवारी सायंकाळी विशिष्ट समुदायाच्या ७८ कुटुंबांनी या जमिनीवर अतिक्रमण केले. त्या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाने चुन्याच्या साहाय्याने आपापली जागा आखून घेतली. गणेशपूर येथील रहिवाशांनी त्याबाबत सरपंचांना कळवले. गायवाडीच्या सरपंच देवता वानखडे व ग्रामसेवक निरंजन गायगोले यांनी तहसीलदार व पोलिसांना सोमवारी सकाळी माहिती दिली. त्या ठिकाणी प्रशासनाने सोमवारी धाव घेऊन अतिक्रमणधारकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, आम्हाला आजच लेखी स्वरूपात दुसरी जागा देण्याचे आश्वासन द्या, अन्यथा आमच्यावर कोणतीही कारवाई झाली तरी चालेल, असे त्या ठिकाणी अतिक्रमणकर्त्यांनी प्रशासनाला सुनावले. यावेळी तहसीलदार योगेश देशमुख, गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले, ठाणेदार प्रमेश आत्राम, गायवाडीचे ग्रामसेवक निरंजन गायगोले, ग्रामपंचायत सदस्य राजू सांगळूदकर उपस्थित होते.
कोट
अतिक्रमणाबाबत माहिती मिळाली. गटविकास अधिकाऱ्यांना त्याबाबत कारवाई करण्याची सूचना केली आहे.
- योगेश देशमुख, तहसीलदार, दर्यापूर