पान २ ची लिड
चांदूर बाजार : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रित असली तरी दररोजचा आकडा ७० ते ८० च्या घरात आहे. पूर्वीसारखा हा आकडा २०० ते २५० नसल्याने लोकांच्या बिनधास्त वागण्यात भर पडली आहे. आता तर कोरोनाचा लस आली आहे, मग भीती कशाची, असा सोईस्कर विचार करून मास्कला फाटा दिला जात आहे. सॅनिटायझर तर केव्हाचेच बाद झाले आहे.
दिवसाकाठी ३०० रुग्णसंख्या अमरावतीकरांनी अनुभवल्याने आता दिसणारी ७०/७५ ही संख्या गौण, मात्र दखलनीय आहे. तथापि, लस आली म्हणून मास्कची काय गरज, असा गैरसमज वाढत आहे.जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल २१ हजारांच्या पुढे गेला असताना, मास्क वापरण्याचा कंटाळा केला जात आहे. फिजिकल डिन्टन्सिंगबाबतही लोक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. त्यांना दंडित करून महसुलात भर घालण्याचा प्रशासनाकडून काहीही प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळेदेखील लोकांमधील बिनधास्तपणा वाढून कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.
अनलॉक करताना प्रशासनाने अनेक नियमांचे पालन करण्याच्या अटी घातल्या. त्यात दुकानदारांनी स्वत: मास्कचा वापर करण्यासोबतच ग्राहकांसाठी अनिवार्य केले. याशिवाय दुकानामध्ये सॅनिटायजरची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढल्यानंतर पुढील दोन ते अडीच महिने बहुतांश रुग्ण हे बाहेरून आलेले आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये असणारे होते. आता काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. मात्र, महिनाभरापासून संसर्गाचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. कोरोना व्हायरसचे नवे धोकादायक स्वरूप प्रकट होत असून, हा संसर्ग आता पुन्हा बाधित करण्यासाठी सज्ज झाला असल्याचे चित्र आहे.
बॉक्स
कारवाईत शिथिलता
प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे काळाची गरज आहे. बाहेर वावरताना मास्कचा वापर आणि शारीर अंतर याबाबत काही लोक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी नियमाचे पालन करून घराबाहेर पडताना मास्क लावणे, गर्दीत जाणे टाळणे, स्वछता पाळणे आवश्यक आहे. सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होत असला तरी साथ संपलेली नसल्याने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. पोलीस व अन्य यंत्रणांकडून आता मास्क न वापरणाऱ्यांविरोधात मोहिमेला पूर्णविराम दिला गेला आहे. त्यामुळेही काही लोक मास्कला फाटा देत असल्याचे चित्र आहे.
कोट
कोरोनाबाधितांची संख्या पुर्वीच्या तुलनेत कमी दिसत असली तरी आजही एखाद्या शहर वा तालुक्यात एकाच दिवशी १८-२० रुग्ण आढळत आहेत. लस आली म्हणून स्वैर वागता येणार नाही.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी
---------------