अमरावती : संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक रविवार, दि. ३१ जानेवारी रोजी नियोजन भवन येथे सकाळी ११ वाजता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट उभे राहिले. कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे बैठकांवर निर्बंध आले . त्यानंतर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली ही आचारसंहिता संपल्यानंतर लगेच संपूर्ण जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. यामुळे २५ जानेवारी २०२० नंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली नव्हती. त्यामुळे वर्षभरानंतर होत असलेल्या या बैठकीत प्रामुख्याने सन २०१९ या वर्षाच्या खर्चाला मान्यता, सन २०२०-२१च्या खर्चाचा आढावा, चालू वर्षाच्या खर्चाचे नियोजन यासह सन २०२०-२१ च्या खर्चाच्या आराखड्यास मंजुरी दिली जाणार आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने नियोजन समितीला विशेष महत्त्व आहे.