जिल्हाधिकाऱ्यांकडून मोर्शी, तिवसा केंद्रांना भेट, विविध बाबींच्या संनियंत्रणासाठी तालुकास्तरीय समिती गठित
अमरावती : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सीमा प्रशासनाने बंद केल्या असून, तपासणीसाठी ठिकठिकाणी पोस्ट निर्माण केले आहेत. अतिजोखमीच्या क्षेत्रातून प्रवासाला मर्यादा घालण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी येथे सांगितले.
राज्यात कोविड विषाणूचा फैलाव कमी करण्यासाठी केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, उत्तराखंड या राज्यांना संवेदनशील क्षेत्रे घोषित करण्यात आली आहेत. त्याबाबत रेल्वे स्थानकावर तपासणीसाठी यापूर्वीच पथके नियुक्त करण्यात आली आहेत. अनावश्यक प्रवासावर मर्यादा घालण्यात आली असून, ठिकठिकाणी तपासणीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी तिवसा व मोर्शी येथे भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. तिवसा येथील पंचायत समितीत स्थापित कंट्रोल रूमला भेट देऊन त्यांनी दैनंदिन रुग्णस्थितीचा आढावा घेतला तसेच ग्रामीण रुग्णालयालाही भेट दिली. उपलब्ध खाटा, खाटा वाढविण्याची गरज पडल्यास आवश्यक सुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता याबाबत त्यांनी आढावा घेतला.
------------
लसीकरणासाठी टोकन प्रणाली
जिल्हाधिकाऱ्यांनी मोर्शी येथील रुग्णालय व्यवस्थेचीही पाहणी केली. ऑक्सिजन व इतर आवश्यक बाबींसंदर्भात वेळोवेळी माहिती द्यावी, जेणेकरून सर्व प्रकारची उपलब्धता करून दिली जाईल. लसीकरण केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी टोकन सिस्टीम राबवावी, जेणेकरून गर्दीही टळेल व वेळेबाबत पूर्वकल्पना मिळाल्याने नागरिकांचाही वेळ वाचेल, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
--------------
तालुकास्तरीत समिती गठित
तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या उपचार सुविधा तसेच लसीकरण आदी बाबींचे सनियंत्रण करण्यासाठी तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने प्रत्येक बाब वेळोवेळी तपासून त्यानुसार कार्यवाही करावी व जिल्हा प्रशासनाशी समन्वय ठेवावा, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.