तहसीलवर धडक : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी निवेदनतिवसा : अखिल भारतीय कामगारांचे संपाला पाठींबा म्हणून महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लालबावटा) व महाराष्ट्र राज्य किसान सभा, एसएफआय, डिवायएफआय या संघटनेचेवतीने केंद्र व राज्य सरकारचे कामगार किसान, मजूर विरोधी धोरणाला घेऊन तिवसा तहसील कचेरीवर निदर्शने आंदोलन केले. दोन्ही संघटनेचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. महागाई कमी करा, शेतकऱ्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, शेतमाल खरेदी करण्यासाठी शासनाने यंत्रणा उभी करावी, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करावी, त्याचप्रमाणे शेतमजुरासाठी केंद्रीय कायदा लागू करा, कल्याणकारी मंडळ निर्माण करा, मनरेगाचे कायद्याची योग्य अंमलबजावणी करा, मजुरांना किमान वेतन ३०० रुपये द्या, सर्व गरिबांना ३५ किलो धान्य देण्यासाठी अन्न सुरक्षा कायद्याची जाणीवपूर्वक अंमलबजावणी करा, सर्व बेघर लोकांना घरासाठी जागा मिळण्यासाठी गावठाण विस्ताराची अंमलबजावणी करा, शेतमजुरांसाठी पेन्शनचा कायदा पास करा, या मागण्यांचे निवेदन भारताचे पंतप्रधान यांना तहसीलदार तिवसामार्फत सादर करण्यात आले. या निदर्शने आंदोलनात तिवसा तालुक्यातील शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव दिलीप शापामोहन, किसान सभेचे जिल्हा सचिव महादेव गारपवार, सरला सोळंके, अंकूश वाघ, ओमप्रकाश वाघमारे, बेबी सुरजुसे, अजय गारपवार, प्रफुल निकाळजे, प्रताप अंभोरे, वंदना राऊत, सुनीता मेश्राम, सविता मोरे, राजू सोळंके, सविता सुरजुसे, सुधाकर वऱ्हाडे, संगीता सोळंके, सुनील राऊत, शफीक शहा इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. शेवटी लालबावटा जिंदाबादचे गगनभेदी घोषणा देऊन आंदोलन संपविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
शेतमजूर युनियनची निदर्शने
By admin | Updated: September 4, 2016 00:22 IST