बच्चू कडू : आक्रमक आंदोलनांद्वारे अपंगांसाठी १७ शासनादेशअमरावती : वैशिष्ट््यपूर्ण आंदोलनांसाठी राज्यभर परिचित असलेले अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांची रुग्णसेवा ही आणखी एक ओळख सामान्यांना आहे. अलिकडे त्यांच्या या परिचयात देशभक्ती आणि अपंगांच्या हक्कांसाठीची आंदोलने या दोन मुद्यांची भर पडली आहे. अपंगहक्कांसाठीच्या लढ्यात बच्चू कडू यांना मिळालेले यश दखलनीय आहे. आजपावेतो एकूण १७ शासननिर्णय त्यांच्या लढ्यामुळे पारीत होऊ शकलेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी चांदूरबाजार तालुक्यातील टोंगलापूर-मासोद येथे अपंग पूनर्वसन केंद्राचे उद्घाटन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कडू यांच्या या अपंगहक्कांसाठीच्या लढ्याचे महत्त्व आगळे ठरावे. अपंगांना रोज नाना समस्यांना सामोरे जावे लागते. शाळेतील शिक्षणापासून तर नोकरीपर्यंत अपंगांची अनेकदा अनेक ठिकाणी हेळसांड होते. त्यांच्यासाठी असाव्यात त्या सोयी उपलब्ध नाहीत. 'शासनाचा दृष्टीकोण कितीही मृदु असला तरी प्रशासन कठोर आहे', हाच अनुभव अपंगांचा! अपंगांच्या गरजांसाठी लढणारेही तसे विरळेच. अपंगच स्वत:चा लढा स्वत: उभारणार, हेच आजवर दिसत आलेले चित्र. कुणी हट्टाकट्टा प्रभावी नेता अपंगांसाठी आंदोलने करताना दिसला नाही. बेलोऱ्याचे बच्चू कडू मात्र याला अपवाद ठरले. अपंगांसाठी कुण्या सुदृढ व्यक्तिनेच लढायला हवे, हा विचार त्यांच्या डोक्यात चमकून गेला. ती व्यक्ती मीच का असू नये हा दुसरा विचार त्यांना अंतर्मूख करून गेला. पुढे हा विचार ज्वाला बनला. राज्यभर आंदोलनरूपी मशाली या ज्वालेने पेटविल्या. त्याचा परिणाम बघा- लागोपाठ १७ शासननिर्णय अपंगांसाठी शासनाला काढावे लागले. अपंगांना ३ टक्के निधी, ३ टक्के गाळे वाटप, शासकीय सेवेतील ३ टक्के जागा तातडीने भरणे, संजय गांधी निराधार योजनेत मिळणारे ६०० रुपये अनुदान १००० रुपयांपर्यंत वाढविणे, अपंगांना विनाअट घरकूल आदी निर्णयांचा त्यात समावेश आहे.अलिकडेच बच्चू कडू यांनी दिल्लीत धडक दिली. राजनाथसिंहांना भेटून त्यांनी काही मागण्या केल्यात. द्याल तर ठीक, नाही तर ५० हजार अपंगांची धडक दिल्लीत ठरलेलीच, असा इशाराच त्यांनी दिला. अपंगांसाठी खरे तर काही मागावेच लागू नये. आम्ही आंदोलने करून मागतोय ते उपकार केल्यागत का देता? अपंगांना त्यांचा सर्वंकष मूळ हक्क मिळवून द्यायचा असेल तर दिल्ली हलवावी लागेल, या विचाराने बच्चू कडू दिल्लीत धडकले. आंदोलनाबाबत जे ठाणले, ते केले- हा बच्चू कडू यांच्याबाबतचा आजवरचा अनुभव. शेतकऱ्यांसाठी मुंबईचे व्हीटी स्टेशन ताब्यात घेणारे कडू नजिकच्या भविष्यात दिल्ली जाम करून खळबळ उडवून गेले तर नवल वाटू नये!
राज्यभर चेतविली मशाल आता हलविणार दिल्ली
By admin | Updated: February 5, 2016 00:07 IST