सचिन सुंदरकर - अमरावतीसंत्रा बागांमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे प्रमाण कमी झाल्याने आणि पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती लागली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची भिस्त मृगबहारावर होती. परंंतु मृगबहाराचीही फूट नसल्याने जिल्ह्यातील संत्राउत्पादक शेतकरी हादरला आहे.अमरावती जिल्ह्यात सुमारे ८० हजार हेक्टरमध्ये संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी ४५ टक्के क्षेत्र मोर्शी व वरुड तालुक्यातील आहे. नैेसर्गिक वातावरण आणि पावसाअभावी ७० हजार हेक्टरमधील संत्रा बागावर मृगबहाराची फूट नाही. यंदा पाऊस दरवर्षीच्या तुलनेत कमी झाल्याने आणि वातावरणात कमालीचा बदल होत गेल्याने आंबिया बहाराची संत्री सुध्दा गळू लागली. जिल्ह्यात ७८ हजार ४८० हेक्टरक्षेत्रात संत्र्याचे उत्पादन घेण्यात येते. यापैकी संत्रा उत्पादन हे ५४ हजार ९९५ हेक्टरमध्ये घेण्यात येते. उर्वरित २४ हजार २८५ हेक्टरमधील संत्रा झाडे ही १ ते ६ वर्ष वयाची आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यात देखिल सिंचनासाठी पाण्याची कमतरता असल्यामुळे ६० ते ७० टक्के संत्रा उत्पादक नैेसर्गिकरित्या येणाऱ्या मृगबहारालाच प्राधान्य देतात. संत्र्याला आंबिया बहार हा साधारणत: जानेवारी महिन्यात फुटतो. परंंतु जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांजवळ संत्रा बागांना पाणी देण्याची सोय आहे. ते शेतकरी आंबिया बहार फोडतात. तर उर्वरित शेतकरी पाण्याची सोय नसल्याने मृगबहाच्या आशेवर असतो. मृगबहार फोडण्यासाठी झाडांना ताण दिला जातो. याला तळण देणे असे म्हणतात. परिणामी झाडे छोट्या फांद्यामध्ये अन्नद्रव्ये साठवितात. जून महिन्यात मृगाचा पाऊस पडल्यानंतर आर्द्रता निर्माण होते. त्यावेळी साठवलेली अन्नद्रव्ये मृगबहारासाठी प्रतिकूल स्थिती असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी आता चांगलेच अडचणीत आले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे संत्रा झाडे आहेत ते शेतकरी इतर पीके घेऊ शकत नाही. त्यांची भिस्तच संत्र्यावर अवलंबून असते. एप्रिल मे महिन्यात तडन दिलेल्या झाडांची वाढ थांबते. झाड जगण्यासाठी अन्नद्रव्ये साठवितात. मृगाचा पाऊस आल्यानंतर झाडाला नवती किंंवा मृगबहार फुटतो. परंतु यंदा पाऊस नसल्याने विपरित स्थिती आहे.
मृग फुटलाच नाही, आंबियालाही गळती
By admin | Updated: August 19, 2014 23:25 IST