अमरावती : ऑनलाईन शिक्षणामुळे अभ्यासक्रमाचे कमी झालेले आकलन, अजून ३० टक्के शिल्लक असलेला अभ्यासक्रम, सराव आणि उजळणीला मिळत असलेल्या कमी कालावधीमुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांत परीक्षांविषयी ताण वाढला आहे. करिअरच्या दृष्टीने दहावी, बारावीचे गुण महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंता वाढली आहे. आणखी २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
कोरोनामुळे दहावी, बारावीचे ऑनलाईन वर्ग जूनपासून सुरू झाले आहे. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नोव्हेंबरपासून ऑफलाईन वर्ग सुरू भरू लागले. त्यावेळी ऑनलाईन शिक्षणातून बहुतांश संकल्पना समजत नसल्याचे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगितले. त्यानुसार विद्यार्थी हितासाठी अनेक शाळांनी पहिल्यापासून शिकवण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला. उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रमापैकी आतापर्यंत ४५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. एक दिवस आड भरणारे वर्ग, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जादा तास घेण्यातील अडचणीमुळे उर्वरित ३० टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे शाळांना अडचणींचे ठरणारे आहे.
-------------------
ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना अधिकतर अभ्यासक्रम नीट समजलेला नाही. विद्यार्थी हित लक्षात घेऊन ५० टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घ्यावी.
- राजकन्या चवरे, पालक.
-----------------
विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण वाढत असल्याचे वास्तव आहे. ताे कमी करण्यासाठी अभ्यासक्रम आणखी कमी करावा. तामिळनाडुप्रमाणे शाळास्तरावर परीक्षा घेण्याचा विचार करावा.
- प्रकाश पाटील, पालक
-------------
ऑनलाईन शिक्षणामुळे वर्गातील प्रत्यक्ष संकल्पना विद्यार्थ्यांना समजल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षांचा ताण आला आहे. यंदा प्रश्नपत्रिकेची काठीण्यपातळी थोडी कमी करावी. उताऱ्यातील प्रश्नांची संख्या वाढवावी.
- चुटकी रोकडे, दहावी.
----------------
संभ्रम दूर व्हावा
शासनाने दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या स्वरुपाबाबत संभ्रम आहे. वर्णनात्मक की एमसीक्यू (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) स्वरूप असणार हे लवकर स्पष्ट व्हावे.
----------------
अमरावती विभागातील विद्यार्थी संख्या
दहावी : १६४६३२
बारावी : १३७५६९