अमरावती : विनामास्क रस्त्यावरून फिरणे, सामाजिक अंतर न पाळणे, लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणे अशा एकूण ४१ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याची कारवाई मंगळवारी दिवसभर करण्यात आली. बुधवारी सकाळपासून गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरूच होती.
वाहतूक पोलिसांनीसुद्धा शहरात ३०५ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगाररून ई-चलानच्या माध्यामातून ४८ हजार ६०० रुपये दंड स्वरुपात वसूल केले. काही वाहनधारकांकडून जाग्यावरच दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. सायंकाळी पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी रस्त्यावर उतरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची झडती घेतली. काही नाकाबंदी पॉईंट व फिक्स पॉइंटला त्यांनी भेटी देऊन पाहणी केली. नागरिक नियम पाळत नसतील विनाकारण बाहेर फिरत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे निर्देशही त्यांनी संबंधित ठाणेदारांना दिले. पोलीस आयुक्त स्वत: रस्त्यावर फिरत असल्याने शहरातील पोलीस अलर्ट झाले होते.