अमरावती : कोरोना संसर्गाने शुक्रवारी आठ जणांचा मृत्यू झाला, तर ७५४ पॉझिटिव्ह आढळून आले. १९८३ नमुन्यांच्या तपासणीतून हा आकडा पुढे आला आहे. जिल्ह्यात आता संक्रमितांची संख्या एकूण ३३ हजार ५८५ इतकी झाली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यात होत असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
जिल्ह्यात कोरोना उद्रेक लक्षात घेता, त्यावर नियंत्रणासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह एकूणच यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असताना संक्रमितांची संख्या लक्षणीय ठरत आहे. कोरोना नियमांचे पालन होण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गत २४ तासांत कोरोनाने आठ बाधितांचा मृत्यू झाला. यात स्वस्तिकनगरातील ७० वर्षीय पुरुष, विलासगनरातील ५७ वर्षीय पुरुष, बेलपुऱ्यातील ६० वर्षीय पुरुष, दर्यापूर येथील ६३ वर्षीय पुरुष, महाजनपुऱ्यातील ६० वर्षीय पुरुष, द्वारकानगर (परतवाडा) येथील ५३ वर्षीय महिला, अमरावती येथील राष्ट्रसंत कॉलनी येथील २८ वर्षीय पुरुष व गजानननगर येथील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. एकंदरीत सात पुरुष आणि एक महिलेचा कोरोनाने बळी घेतला. आतापर्यंत ४९५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शुक्रवारी एकूण ७५४ पॉझिटिव्ह आढळून आले असून, ५९४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गृह विलगीकरणात महापालिका क्षेत्रात २३५७, तर ग्रामीण भागात ११२६ रुग्ण आहेत. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ४७३२ इतकी आहे.
कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने रिकव्हरी रेट ८४.४४ टक्के एवढा खालावला आहे. डब्लिंग रेट १०५ दिवसांवर आला आहे. मृत्युदर १.४७ टक्के आहे. एकूण २ लाख २० हजार ४८९ नमुने चाचणी झाली आहेत.