अमरावती : गतवर्षी प्रारंभीच्या काळात शहरी भागात वाढणारा संसर्ग ग्रामीण भागात पसरला होता. यावर्षी मात्र प्रारंभापासूनच ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळत असून, शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील निर्बंधाची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात गत १ मार्च ते ८ पर्यंत जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील गावांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गुरुवारी जिल्ह्यात ३७८ कोरोना संक्रमित आढळून आले होते. त्यापैकी ग्रामीण भागातील २०० हून अधिक रुग्णांचा समावेश होता. १४ तालुक्यांत १ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत ७,५२४ कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. आरोग्य विभागाकडून उपलब्ध आकडेवारी नुसार १०८ रुग्ण दगावल्याची नोंद आहे. आतापर्यंत १७,०७५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान तालुकानिहाय विचार करता सध्याच्या ॲक्टिव्ह असलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण वरूड तालुक्यात ३१६, त्यापाठोपाठ अचलपूर तालुक्यात १८६, तिवसा १४३, धारणी १७२, मोर्शी १२७, धामणगाव रेल्वे १०७, चिखलदरा ९८, अंजनगाव सुर्जी ९२, चांदूर बाजार ८३, अमरावती ५३, दर्यापूर ४९, नांदगाव खंडेश्र्वर ४२, भातकुली २९, याप्रमाणे कोरोना संक्रमित रूग्ण ॲक्टिव्ह आहेत. विशेष म्हणजे मागील काही दिवसांत शहरापाठोपाठ ग्रामीण भागातील कोरोना संक्रमितांची संख्या वाढली असल्याने आरोग्य विभागासाठी आव्हान ठरत आहे. परिणामी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही कडक निर्बंध आणणे गरजेचे झाले आहे.
ग्रामीण भागातही वाढतो कोरोनाचा संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:13 IST