बळवंत वानखडे :
दर्यापूर : तालुका हा खारपाणपट्ट्याचा भाग असल्याने येथील शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पिके घेता यावीत, त्यादृष्टीने तालुक्यातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश आमदार बळवंत वानखडे यांनी दिले.
शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून २ एप्रिल रोजी आ. वानखडे यांनी तालुक्यातील सिंचन प्रकल्पावर जाऊन आढावा घेतला. तालुक्यातील सामदा लघु प्रकल्प, वाघाडी बॅरेज, चंद्रभागा बॅरेज या प्रकल्पांना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत भेटी देऊन प्रलंबित विषयांचा आढावा घेतला. प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची शेती व वहिवाटीचे रस्ते मोठ्या प्रमाणात बाधित झाले असून, पावसाळ्यापूर्वी तात्काळ वहिवाटीचे रस्ते पूर्ण करण्याचे आदेश आमदारांनी दिले. याशिवाय सामदा प्रकल्प अंतर्गत पाणी पूर्ण क्षमतेने अडवण्याचे निर्देश दिले. वाघाडी बॅरेज अंतर्गत यंदा पाणी अडवण्याबाबत सूचना केल्या तसेच तेथील प्रकल्पबाधित शेतीच्या वहिवाटीचे रस्ते तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राशनकर, उपविभागीय अभियंता गिरी, कनिष्ठ अभियंता गुल्हाने, गोपाळ तराळ, प्रभाकर तराळ, गजाननराव देवतळे, गुड्डू गावंडे, राजू कराळे, बंडू दाभाडे उपस्थित होते.
--------------