अमरावती : मार्चपासून २०२० बंद असलेली महाविद्यालये १५ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू होणार आहे. कोरोना नियमावलींचे पालन करून वर्गात शिकवणीसाठी ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती राहील, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने बुधवारी जारी केलेल्या परिपत्रकातून स्पष्ट केले.
महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील विद्यापीठे, महाविद्यालये सुरू करताना आपत्ती प्राधिकरण व्यवस्थापनाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांची परवानगी अनिवार्य असणार आहे. वर्गात आळीपाळीने विद्यार्थी बोलावले जातील. वर्गात गर्दी होणार नाही, याची काळजी प्राचार्य, प्राध्यापकांना घ्यावी लागेल. मास्कचा वापर, ऑक्सिजन तपासणी, थर्मल गनद्धारे तापमान तपासणी, शारीरिक अंतर ठेवणे बंधनकारक केले आहे. यूजीसीच्या ५ नोव्हेंबर २०२० च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन महाविद्यालयांना करावे लाागेल, असे परिपत्रकात नमूद आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित ३८४ महाविद्यालये आता १५ फेब्रुवारीपासून उघडतील, असे स्पष्ट झाले आहे.