भाजप म्हणतो - आम्ही, काँग्रेस म्हणते - आम्ही
चांदूर रेल्वे : महिन्याभरापासून सुरू असलेल्या २९ ग्रामपंचायतींच्या निवडणूक रणधुमाळीत काँग्रेसने बाजी मारल्याचा दावा केला, तर भाजपनेही आपल्याच जागा जास्त आल्याचा दावा केला आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्र लढल्याने अंदाज काढणे कठीण होत आहे. तहसील कार्यालयात सोमवारी सकाळी साडेदहापासून निकाल सुरू झाले. मिळाले १६ जागी काँग्रेसप्रणीत पॅनेल, तर १२ जागांवर भाजपप्रणीत पॅनेल विजयी झाल्याचे पदाधिकाऱ्यांच्या चर्चेतून पुढे आले. तालुक्यातील घुईखेड, आमला, पळसखेड, राजुरा या चार मोठ्या ग्रामपंचायतींवर मात्र भाजपने पकड मजबूत ठेवली. मतदानासाठी निवडणूक निरीक्षक राम लंके होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार राजेंद्र इंगळे, नायब तहसीलदार बबन राठोड, यांनी काम हाताळले. अनुचित प्रकार होऊ नये म्हणून ठाणेदार मगन मेहते यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला. सावंगा विठोबा ग्रामपंचायतमध्ये पंचायत समिती सदस्य अमोल होले यांच्या नेतृत्वात याहीवेळी सातपैकी सात जागा जिंकून काँग्रेसने वर्चस्व राखले. सावंगा मग्रापूर येथील एका उमेदवाराच्या मतमोजणी दरम्यान प्रिंट मिस्टेक झाली. त्यांनतर पुन्हा मतमोजणी करून निकाल देण्यात आला.