अमरावती : सदोष आणि अप्रमाणित बियाण्यांच्या विक्रीला चाप लावण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यातील सर्वच बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशक विक्रीच्या दुकानांची तपासणी केली जाणार आहे. सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भासण्याची चिन्हे असल्याने असे अप्रमाणित व बनावट बियाणे शेतकर्यांच्या माथी मारले जाण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने याबाबतच्या कारवाईचे नियोजन केले आहे. या सर्वच परवानाधारकांच्या दुकानांची तसेच गोदामांची पाहणी येत्या महिनाभरात केली जाणार आहे. सद्यस्थितीत सोयाबीनचे प्रति क्विंटल भाव ४४00 ते ४५00 रूपये तर त्याच्या बियाण्यांची प्रति बॅग सरासरी २३८५ ते २६00 रूपयांच्या घरात आहे. बाजारात बियाण्यांची उपलब्धता वा विक्रीत काळाबाजार होत असल्यास जिल्हा व तालुकास्तरावर सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. या कक्षातील दूरध्वनीवर शेतकरी तक्रार करू शकतात. त्यासाठी कार्यालयातील कर्मचारी नेमण्यात आले आहेत. जिल्ह्यात ९७ हजार ४00 मेट्रिक टन रासायनिक खत लागणार असून ते पुरविणार्या परवानाधारक घाऊक खत विक्रेत्यांची संख्या ९७ आहे. जिल्ह्यात यावर्षी १ लाख ६७ हजार ८५0 क्विंटल सोयाबीन, ७ हजार ५९0 क्विंटल तूर आणि १ लाख ५९ हजार हेक्टर क्षेत्रासाठी बीटी कपाशीचे एकूण ८ लाख ७४४ पाकिटे लागण्याचा अंदाज आहे. त्यानुसार कृषी केंद्रांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. शेतकर्यांनी सावध रहावे. (तालुका प्रतिनिधी)
बियाणे विक्रीच्या दुकानांची होणार तपासणी
By admin | Updated: May 15, 2014 23:06 IST