अमरावती : अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील विजेच्या समस्या वारंवार पाठपुरावा करूनही सोडविल्या जात नसल्याने शनिवारी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी येथील वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता दिलीप घुगल यांच्या दालनात ठिय्या देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. अचलपूर व चांदूरबाजार या दोन तालुक्यात वीज वितरण कंपनीकडून शेतकरी व नागरिकांची गैरसोय होत आहे या पार्श्वभूमीवर प्रहारने २८ आॅक्टोबर रोजी अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देऊन माधान, घाटलाडकी, आसेगाव येथे ५ एम. व्ही. ए. चे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावे, आसेगाव व करजगाव येथे १३२ केव्हीचे नवीन सबस्टेशन त्वरीत सुरू करावे, हिरुळपूर्णा, हरम, मेघनाथपूर, सुलतानपूर येथे इन्फ्रा २ मध्ये ३३ केव्हीचे सबस्टेशन सुरू करावे. अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील २०० विद्युत डीपी जळाल्या असून त्या त्वरीत बदलण्यात याव्या, मंजूर झालेल्या नवीन डीपीची कामे त्वरीत सुरू करावी, विद्युत डीपीचे ट्रान्सफॉर्मर ६३ ऐवजी १०० ट्रान्समिटरचे बसविण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन दिले होते. १ नोव्हेंबरपर्यंत यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली असताना वीज कंपनीने यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने शनिवारी प्रहार कार्यकर्त्यांनी अधीक्षक अभियंता दिलीप घुगल यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करीत या मागण्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी कार्यालयात फटाके फोडूनही आपला संताप व्यक्त केला. दरम्यान प्रहारच्या मागणीबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. आंदोलनात मंगेश देशमुख, राजेश वाटाणे, सुरेश गणेशकर, बाळासाहेब वाकोडे, राजेश सोलव, भास्कर सांयदे शिवा भुयार, अजय तायडे, गजानन ठाकरे, एकनाथ अवसरमोल, संतोष किटुकले भगवंत दामेधर, संजय झिंगरे, अजय राऊत, सुरेश भेंडे, सतीश राऊत अरूण गणथडे याशिम कुरेशी, नामदेव सावरकर आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
वीज कार्यालयात प्रहारचा डेरा
By admin | Updated: November 1, 2014 22:46 IST