जरूड : तालुक्यात वीज देयके वसुलीची धडक मोहीम सुरू असून, गावागावांत थकीत वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम जोरात सुरू आहे. 'पोट भरावे की, वीज बिल' असा सवाल वीजग्राहकांचा आहे. वीज कंपनीच्या या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून शासनाने शिथिलता देण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.
कोरोनामुळे अनेक उद्योग धंदे, शेती कामावर परिणाम होऊन अनेकांचे अर्थचक्र थांबले आहे. परंतु दैनंदिन गरजा त्याच असल्याने पोटाची खळगी कशी भरावी, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. यातच एक वर्षापासून कोरोना प्रादुर्भावाने संकटात सापडलेल्या नागरिकांना जगावे तर कसे, असा प्रश्न पडला आहे. यातच वीज वितरण कंपनीने थकीत वीजबिल ग्राहकाकडे वसुलीचा तगादा लावत वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम उघडली असून, कमीतकमी ७० टक्के थकीत वीज भरण्याची मागणी केली जात आहे. परंतु जेथे पोटाची खळगी भरण्याची चिंता वाढली असताना वीज बिल कसे भरणार, हा प्रश्नच आहे. ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात वीज कंपनीने सपाटा चालविल्याने अनेकांच्या घरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.