अमरावती : राज्य शासनाच्या नियमानुसार प्रकल्प भागातील स्थानिकांना रोजगार मिळणे अपेक्षित आहे. सोफियात परप्रांतीयांना नोकरी देण्यात आल्याचे प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे, ही बाब ना. पोटे यांनी अधिकाऱ्यांच्या पुढ्यात ठेवली. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात, त्या प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबीयांना नोकरी मिळावी, असा नियम असताना त्यांनी नोकरीसाठी पायपीट का करावी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कामे करताना पारदर्शकता आणा, ज्या जागा भरायच्या आहेत, त्यांची वृत्तपत्रात जाहिरात देऊन यादी प्रसिद्ध करा, असे निर्देश ना. पोटे यांनी दिले. प्रकल्पग्रस्तांना नोकरी, मोबदल्यासाठी जो त्रास होत आहे, त्याच्या भडका उडाल्यास खैर राहणार नाही, असे संकेत त्यांनी दिले. रोजगार देताना पारदर्शकता आणा, कोणाचाही वशीला मागू नका, जे योग्य असेल तेच करा, अन्यथा सोफियाच्या अधिकाऱ्यांना राहणे कठीण होईल, असे त्यांनी सुणावले. मला ‘मिनिस्टरी’ ही जनतेसाठी मिळाली असून न्याय देण्यासाठी त्यांच्याच बाजूने उभा राहील. जमीन देताना ती शेतकऱ्यांनी इंडिया बुल्स कंपनीला दिली असून नोकरीचे हमी पत्रदेखील त्याच कंपनीच्या नावे मिळावेत, असे पालकमंत्री सांगितले. तसेच क्षमतेपेक्षा जास्त कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांचा विषय हाताळताना रस्ते दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावी, शेतकरी मरणासन्न अवस्थेत असून त्याच्याजवळ विष घ्यायलाही पैसे नाहीत, अशी व्यथा मांडताना पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांना शेतकरीविरुद्ध सोफिया कंपनीला संरक्षण देऊ नका, अशा सूचना केल्यात. प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश शिगेला पोहचत असून तेच सोफिया प्रकल्पाचे मालक आहेत. त्यामुळे नोकरी देताना मार्ग काढा, पारदर्शकपणे नोकरभरती राबवा, कुणालाही मागच्या दाराने नोकऱ्या देऊ नका, समोरच्या दाराचा वापर करा, अशी तंबी सुद्धा पालकमंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांना न्याय देताना कोणतीही तडजोड करणार नाही. केवळ पारदर्शकता आणूनच काम झाले पाहिजे, अन्यथा सोफियाची खैर नाही, असेदेखील पालकमंत्री सांगितले. (प्रतिनिधी)
कामात पारदर्शकता आणा
By admin | Updated: February 16, 2015 00:28 IST