पान २ ची लिड
कापूस घरातच : अंगाला खाज सुटण्याच्या प्रकारात वाढ
राजुरा बाजार : तीन महिन्यांपासून भाववाढ न झाल्याने शेतकऱ्यांच्या घरात शेकडो क्विंटल कापूस विक्रीविना घरात पडून आहे. परिणामी, अंगाला खाज सुटत असल्याने कुटुंबातील सदस्य कापूस विकण्यासाठी कुटुंबप्रमुखाकडे तगादा लावत आहे.
विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला हा कापूस पट्टा म्हणून ओळखला जातो. 'पांढरे सोने' म्हणून परिचित असलेल्या या पिकाला जिल्ह्यात 'कॅश क्रॉप' संबोधले जाते. कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खतांच्या किमतीत व मजुरीत भरमसाठ वाढ झाल्याने कापसाला मिळणारा सहा हजार रुपये प्रतिक्विंटल दरदेखील परवडणारा नाही. एकदम रोखीने पैसे येत असल्याने संपूर्ण कापूस एकाच वेळी विकण्यासाठी शेतकरी उत्सुक असतात.
गतवर्षी कापसाचे दर ५१०० ते ५३०० प्रतिक्विंटल असे होते. यावर्षी गेल्या तीन महिन्यांपासून कापूस ५९०० ते सहा हजारांवर स्थिर आहेत. मार्च उलटूनही भाव वाढले नाही. कापूस निघून आता सहा महिने झाले. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे व कापसामध्ये मॉइश्चरायझर कमी होऊन भारमान घटत होते. त्यातच कापसाची गंजी लावून जास्त दिवस झाल्याने कुटुंबातील सदस्यांना खाजेची लागण झाली आहे.
कापूस हंगाम अंतिम टप्प्यात
हजारो क्विंटल कापूस घरात पडून असल्याने व भाव नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. कापूस हंगाम अंतिम टप्प्यात आहे. विशेष म्हणजे, तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनपेक्षाही कापसाला पसंती दिली होती. कापसाचे उत्पादन बोंडअळीमुळे घटले. मात्र, जो उणापुरा कापूस निघाला, तोदेखील चांगल्या दराअभावी घरात पडून आहे.
कोट १
कापसातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आम्ही वर्षभरातील कामे पार पाडतो. घरकाम, लग्न आदी कापसाच्या भरवशावर असते. मार्च संपला की, एप्रिल महिन्यात साधारणपणे भाव वाढ होत असते. मात्र, यंदा कापसाची दरवाढ अद्याप झालेली नाही.
भानुदान भोंडे
शेतकरी, राजुरा बाजार
कोट २
कापसाचे भाव हे मुख्यत: सरकी व रुईवर अवलंबून असतात. विदेशात निर्यातीची मागणी असल्यावर ‘मागणी व पुरवठा' हे अर्थशास्त्र लागू होते. म्हणून यावर बरेच काही ठरत असते.
- राजेश गांधी, अभिषेक कॉट फायबर, वरूड
-----------------