अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हाभरातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांतील इयत्ता पाचवी ते नववीचे वर्ग २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी ई.झेड खान यांनी १२ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या नावे हे आदेश काढले आहेत. दरम्यानच्या कालावधीत विद्थार्थ्याचे ऑनलाईन वर्ग सुरू ठेवावेत तसेच याबाबत सर्व शाळा मुख्याध्यापकांना निर्देशही त्यांनी दिले आहेत.
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर गत २७ जानेवारी पासून शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, १५ दिवसांपासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील ५ ते ९ वी १ हजार ७५६ वर्ग पुन्हा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा आदेश जारी केला आहे. याची अंमलबजावणी सोमवारपासून जिल्हाभरात होणार आहेत.
बॉक्स
दहावी, बारावीचे वर्ग राहणार सुरू
कोरोना वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शहरासह ग्रामीण भागासह इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतचे वर्ग बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र दहावी आणि बारावीचे वर्ग कोरोना प्रतिबंधात्मक त्रिसूत्रीचा अंमल करून सुरू राहणार आहेत.