शासनाने सोडले वाऱ्यावर : लोकप्रतिनिधी करतात नौटंकीअचलपूर : श्रावण महिन्यात सणांची रेलचेल असते. नागपंचमी, रक्षाबंधन उत्साहात आटोपले. अस्मानी व सुल्तानी संकटांनी बळीराजा खचला आहे. सध्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट पसरले आहे. गणेशचतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे जलधारांनी स्वागत करणारा वरुणदेव रुसला आहे. परतीच्या पावसाने मनसोक्त हजेरी लावली नसल्याने किती पीक हाती येते? त्याला भाव काय मिळतो व त्यातून लावलेला खर्च तरी निघतोय का, याचाच विचार सध्या शेतकरी करीत आहेत. संकटाचा मुकाबला करणाऱ्या बळीराजाला आता त्याच्या कुटुंबाची चिंता सतावत आहे.सर्व सणांवर यंदा दुष्काळाचे सावट आहे. वास्तव परिस्थितीतही शेतकऱ्यांचा साथीदार असलेल्या सर्जा-राजाचा सण पोळा नुकताच साजरा केला. पोळ्याच्या सणाला शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. मात्र यावर्षी पिकांची स्थिती बिकट असल्याने त्यांचा पोळा दारिद्र्यातच गेले. अचलपूर-परतवाड्यात अतिवृष्टी, वादळ, गारपीट अशी स्थिती मागील चार- पाच वर्षांपासून अचलपूर तालुल्यातील शेतकरी अनुभवत आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: डबघाईस आला आहे.बाप्पांना साकडेसततच्या नापिकीने झालेल्या कर्जाला कंटाळून गेल्या १४ वर्षांत अचलपूर तालुक्यात दोनशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सन २००२ पासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सुरुवात झाली होती. काही आत्महत्या शासनाने अपात्र ठरविल्या होत्या. अजूनही अस्मानी संकट घोंगावत आहे. शेतकरी दोन हात करीत लढाई लढत आहे. गणेश चतुर्थीला झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण दुसऱ्या दिवशीपासून पावसाने पुन्हा दडी मारली. गणरायाचे आगमन होऊन पाच दिवस झाले आहेत. गणेशोत्सवात पावसाने समाधानकारक हजेरी लावून शेतकऱ्यांना थोडा दिलासा दिला. सर्वत्र दुष्काळाचे वातावरण असल्याने गणेशोत्सवात अपेक्षित उत्साह दिसत नाही. निसर्गाने मारले, राजकारण्यांनी दुष्काळाचे भांडवल करून स्वत:ची पोळी शेकत आहेत. शासनाने वाऱ्यावर सोडले, शेतकऱ्यांचे लेकरु म्हणून मत मागणारे फिरकेनासे झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)
अस्मानी-सुल्तानी संकटांनी बळीराजा हतबल
By admin | Updated: September 23, 2015 00:26 IST