जे. पी. गुप्ता : विभागातील अन्य जिल्ह्यांमध्ये महोत्सवाचे होणार आयोजनअमरावती : देशाला समृध्द संस्कृतीचा वारसा लाभला आहे. देशभरातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचे संवर्धन, जतन व विकास करण्यासाठी पर्यटन महोत्सवात नागरिकांनी सहभागी होणे आवश्यक असल्याचे मत विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांनी मांडले. नुकत्याच पार पडलेल्या चिखलदरा पर्यटन महोत्सवाच्या समारोपीय समारंभात अध्यक्ष पदावरुन ते बोलत होते. याप्रसंगी चिखलदरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी, उपाध्यक्ष रेशमा परविन, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, नगरपरिषदेचे मुख्यधिकारी राहुल करडीले, तहसिलदार सैफान नदाब, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापक प्रशांत सवई आणि पर्यटन महोत्सवाचे समन्वयक प्रवीण येवतीकर उपस्थित होते.पुढे बोलताना गुप्ता म्हणाले, पर्यटकांची पहिली पसंती चिखलदरा असून येथे रोजगार निर्मिती, पर्यटकांना माफक दरात निवासाची व्यवस्था, साहसी खेळांबाबतचे नियोजन व दिवस, रात्री मुक्कामी पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी उत्कृष्ट सुविधा देता यावी, यासाठी शासन-प्रशासन स्तरावर प्रभावी नियोजन करण्यात येईल. गत तीन वषार्पासून चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवात नाविन्य आणण्याचा नेहमी प्रयत्न सुरु आहे. दुरदुरून येणाऱ्या पर्यटकाकरीता आवश्यक सोयी-सुविधा, पर्यटकांना खिळवून ठेवणाऱ्या नवनविन बाबींचा समावेश लवकरच करण्यात येईल. चिखलदरा पर्यटनस्थळाच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन करण्यात येणार असून विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, असे ते म्हणाले. प्रास्ताविक राजेंद्रसिंह सोमवंशी, संचालन संदीप सावरकर, आभार प्रवीण येवतीकर यांनी मानले.विदर्भातील एकमेव पर्यटन स्थळ म्हणजे चिखलदरा आहे. पर्यटन महोत्सव एक आगळावेगळा प्रयत्न आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अप्रतिमच. मात्र, या महोत्सवाबाबत पुरेशी जनजागृती केली जात नाही. तसे झाल्यास या पर्यटन स्थळाकडे पर्यटकांचा ओढा वाढेल.- राजेश डागा, उद्योजक, अमरावती
पर्यटन महोत्सवातून कला, संस्कृती, विविधतेचे जतन
By admin | Updated: March 2, 2017 00:09 IST