अमरावती : ग्रामीण भागातील सहकाराची महत्त्वाची संस्था असणार्या शेतकरी खरेदी विक्री संघाकडे सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. सन २०१२ पासून शेतकर्यांना कृषी विभागाद्वारा मिळणारे बी-बियाणे, फवारणी औषधी, रासायनिक खत, शेती मशागतीचे साहित्य या संस्थेद्वारे वितरित करण्यात येत आहेत. शेतकर्यांशी निगडित याच संस्थेद्वारा यावर्षीदेखील कृषी निविष्ठाचा पुरवठा करण्यात यावा, अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील सर्व आमदारांनी शुक्रवारी राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे केली आहे. जिल्ह्यामधील सर्व तालुक्यात व प्रमुख मोठ्या गावांमध्ये शाखा असणारे खरेदी-विक्री संघ हे ग्रामीण भागामधील शेतकर्यांशी निगडित असणारी महत्वाची संस्था आहे. याच सहकारी संस्थेद्वारा शासनाच्या कृषी विभागाशी संबंधित सर्व योजना चांगल्यारीतीने राबविण्यात आल्या आहेत. या संस्थेकडे सर्व मूलभूत सुविधा, साठवण केंद्र, विक्री केंद्र, माहिती केंद्र व कर्मचारी यंत्रणा उपलब्ध आहेत. परंतु कापूस, धान्य, लेव्ही साखर यासह अन्य सामग्रीचे वितरण बंद करण्यात आल्यामुळे या सहकारी संस्था डबघाईस आलेल्या आहेत. शेतकर्यांना पारदर्शी पद्धतीने साहित्याचे वाटप व्हावे व ग्रामीण भागातील सहकार क्षेत्राला पुन्हा उभारी मिळावी यासाठी कृषी विभागाचेवतीने शेतकर्यांना वितरीत करण्यात येणार्या साहित्याचे वाटप याच संस्थेद्वारे करण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील आमदार यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, केवलराम काळे, खरेदी-विक्री संघाचे अशोकराव काळबांडे, जिल्हा बँकेचे संचालक सुरेशराव साबळे, प्रफुल्ल देशमुख, प्रशांत डहाणे यांनी राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे केली आहे. त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
खरेदी-विक्री संघामार्फतच व्हावे कृषी साहित्याचे वाटप
By admin | Updated: May 23, 2014 23:31 IST