अमरावती : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणारे रस्ते कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला वळते करावे व यासाठी लागणारी जिल्हा परिषदेची एनओसी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्याची मागणी काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात सुमारे २७ सदस्यांच्या स्वाक्षरीने अध्यक्ष यांना पत्राद्वारे केली आहे. रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. मात्र हा निधी खर्च करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे स्वत:च्या मालकीचे रस्ते कमी असल्यामुळे निधी खर्च करताना अडचणी निर्माण होत आहे. शासकीय निधी रस्त्याच्या विकासकामांवर खर्ची घालता यावा, यासाठी जि.प.च्या अखत्यारित असलेले रस्ते विकासकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला वळते करावी व यासाठी लागणारे जिल्हा परिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र देण्याबाबत नियमानुसार विशेष सभा बोलविण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, महेंद्रसिंग गैलवार, गिरीश कराळे आदी सदस्यांसह काँग्रेस, प्रहार व जनसंग्रामच्या काही सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना दिले आहेत. यापूर्वीही जि. प. च्या मालकीचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाला कामांसाठी देण्याबाबतचा विषय चांगलाच तापला होता. विशेष सभेसह अनेक राजकीय उलथापालथी झाल्यानंतर हा मुद्दा पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री यांच्यापर्यंत पोहचला होता. अखेर जिल्हा परिषदेतील सत्ताधारी व विरोधकांमध्ये प्रदीर्घ चर्चेनंतर तोडगा काढून ६ कोटींच्या वाटाघाटीनंतर जिल्हा परिषदेने सार्वजनिक बांधकाम विभागाला नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. परंतु आता पुन्हा नव्याने नाहरकत प्रमाणपत्रासाठी विशेष सभा लावण्याची मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)
पुन्हा जिल्हा परिषदेत एनओसीचा मुद्दा तापणार
By admin | Updated: July 10, 2014 23:20 IST