१३ वर्षीय मुलाचा प्रताप : आई-वडील सोडून गेल्याची बतावणीनरेंद्र जावरे चिखलदरामाझ्या आई-वडिलांनी मला मुंबईवरून चिखलदरा फिरायला आणले. एका पांढऱ्या रंगाच्या तवेरा गाडीत आम्ही आलो होतो. परंतु शनिवारी ते मला सोडून निघून गेले. एका १३ वर्षीय मुलाच्या या माहितीने चिखलदरा पोलिसांना धक्का दिला. दुपारी १२ वाजतापासून त्याच्या आई-वडिलाची सुरू झालेली शोधमोहीम चार तासांच्या खुलाशानंतर मुलाचा खोटारडेपणा उघडकीस आला. आदित्य राजेंद्र टेकाडे (१३, रा. वाशी मुंबई) असे त्या मुलाचे नाव आहे. रविवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान तो चिखलदरा येथील आयटीआय चौकावर परतवाड्याकडे जाणाऱ्या वाहनांना हात दाखवीत होता. काही वेळाने चिखलदरा पोलीस ठाण्याचे जमादार रामचंद्र बुरनासे व अरुण कळसकर हे दुचाकीने जात असताना त्यांना सदर मुलगा दिसला. संशयाची पाल मनात आल्याने त्यांनी मुलास विचारणा केली. आदित्यने उपरोक्त घटनाक्रम कथन करताच दोघांनाही धक्का बसला. त्याला प्रेमाने पोलीस ठाण्यात आणून त्याची विचारपूस केली. आम्ही शनिवारी चिखलदरा फिरायला आलो. त्यांनी मला सनसेट पॉर्इंटवर सायंकाळी ६ वाजता आणले व मला सोडून निघून गेल्याचे सांगितले. पॉर्इंट काढले पिंजूनचिखलदरा हे विदर्भाचे पर्यटन स्थळ. पूर्वी येथील खोल दरीत मोठ्या प्रमाणात आत्महत्या, हत्यासारख्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी आदित्यला सर्व पॉर्इंट फिरविले. वारंवार प्रेमाने माहिती विचारली, जेवायला दिले. त्याने अमरावती येथील गाडगेनगरात बहीण राहत असल्याचे सांगितले. त्याच्या वडिलांच्या दूरध्वनीवर संपर्क केला; परंतु झाला नाही. त्यामुळे सर्व पोलीस यंत्रणा ठाणेदार बी. आर. गिते यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला लागली. चार तासांपर्यंत पत्रकारांपासून सामाजिक कार्यकर्त्यांना संपर्क साधून माहिती देण्याचे कार्य नगरसेवक अरूण तायडे यांनी केले.अन् खुलासा झालापोलीस सतत चार तास आदित्यची विचारपूस करीत होती. परंतु आई-वडिलांनी सोडून दिल्याचे तो सांगत होता. अशात हरिकेन पॉर्इंटवर त्याच्या शोधात निघालेले शिक्षक व पोलिसांची गाठ पडली व खुलासा झाला. आदित्य मुंबई (वाशी) येथील आहे. त्याला पालकांनी शिक्षणासाठी चिखलदरा येथील दीपशिखा शाळेत शनिवारी आणून दिले होते. परंतु आपणास येथे राहायचे नसल्यामुळे आपण हा पर्याय निवडल्याचे त्याने सांगितले. तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला. परंतु सतत चार तास त्याने पोलिसांना वेठीस धरले. आदित्यला सायंकाळी पाच वाजता शिक्षकांच्या स्वाधीन करण्यात आले. अमरावती येथील बहिणीकडे त्याला आता पोहचवून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मुंबईच्या आदित्यने चार तास पोलिसांना धरले वेठीस
By admin | Updated: July 14, 2014 00:47 IST