बहिरम नाका : नोंदणी करून भरावी लागणारी १० टक्के रक्कम
परतवाडा : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात रेती घेऊन येणाऱ्या १० डंपरवर शुक्रवारी दुपारी एक वाजता अचलपूर उपविभागीय अधिकारी तथा चांदूर बाजार तहसीलदारांनी परतवाडा बैतुल मार्गावर कारवाई केली.
अचलपूर, चांदूर बाजार, चिखलदरा या तालुक्यांमध्ये बांधकाम व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशामधून दररोज अनेक डंपरमधून रेती आणली जात आहे. आता राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार जिल्हास्तरावर त्या डंपरची नोंदणी करून दहा टक्के रक्कम गौण खनिज विभागात भरावी लागणार आहे. त्यानंतरच आता परराज्यातील रेती वाहतूकदारांना महाराष्ट्रात प्रवेश मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या ट्रक डंपर यांचे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय महाराष्ट्रात प्रवेश केल्यास त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी ‘लोकमत’ला दिली.
कोट
राज्य शासनाच्या नवीन जीआरनुसार परराज्यातून येणाऱ्या वाळूवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर १० टक्के रक्कम भरावी लागणार आहे. नोंदणी न केलेले व रक्कम न भरलेले वाळूचे डंपर बहिरम नाक्यावर अडविण्यात आले.
- संदीपकुमार अपार, उपविभागीय अधिकारी, अचलपूर