जि. प. कृषीची कारवाई : शेतकऱ्यांची तक्रार, ४३ बॅगची आगाऊ बुकिंगअमरावती : रासायनिक खत कंपनीचे अधिकारी असे दर्शवून भातकुली तालुक्यातील आसरा येथील ८ शेतकऱ्यांना डीएपी या रासायनिक खताच्या नावावर दाणेदार भूवरदान खतांच्या ६३ पोत्यांची विक्री करून फसवणूक करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या पथकाने सोमवारी आसरा येथे जाऊन खताचे नमुने घेऊन खत जप्त केले. तसेच अॅग्रो केमिकल्स या कंपनी व विक्रेत्या विरोधात भातकुली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आसरा येथे दोन दिवसांपूर्वी मोठ्या वाहनाद्वारा दोन व्यक्ती आले होते. त्यांनी अॅग्रो केमिकल्स (एफएमसी) पेट्रोलपंप (ठाणा), भंडारा या डीएपी या रासायनिक कंपनीचे अधिकारी असल्याचे दर्शवून ११८० रूपयांची बॅग केवळ कंपनीच्या प्रचारासाठी १००० रुपयांत देणार आहोत व काही दिवसांसाठीच कंपनीची स्कीम असल्याचे सांगितले. या गावातील ८ शेतकऱ्यांनी ६३ हजारांच्या ६३ बॅग विकत घेतल्या. काही शेतकऱ्यांनी या व्यक्तींना आगाऊ पैसे देऊन ४५ बॅगचीदेखील बुकिंग केली. काही शेतकऱ्यांना याविषयीची शंका आल्याने त्यांनी कृषी विभागाला कळविले. आज जिल्हा परिषद कृषी विभागाच्या पथकाने आसरा गाठून खताची पाहणी केली असता हे खत डीएपी नसून भूवरदान कंपनीचे भूसुधार प्रतीचे दाणेदार खत असल्याचे उघड झाले. बाजारात या खताची किंमत २०० ते २५० रूपयांचे दरम्यान आहे. पथकाद्वारा या खताचे नमुने घेण्यात आले व ते एफ. सी. एल. (फरर्टिलायझर कंट्रोल लॅबारेटरी) येथे पाठविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करून बनावट खत विकणाऱ्या व्यक्तीचे नाव मयूर देशपांडे (रा. भंडारा) व सुमित मेश्राम (रा. यशोदानगर, भीम टेकडीजवळ, अमरावती) असे आहे. कृषी पथकाद्वारा या बनावट रासायनिक खत कंपनी व या दोन्ही विरोधात भातकुली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे, विभागीय गुण नियंत्रण अधिकारी सी. जी. देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शनात कृषी विकास अधिकारी दिलीप काकडे, जिल्हा गुणनियंत्रक अधिकारी पुरूषोत्तम कडू यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.(प्रतिनिधी)
आसरा येथे ६३ हजारांचे बनावट डीएपी खत जप्त
By admin | Updated: June 23, 2014 23:38 IST