संदीप मानकर अमरावती : पश्चिम विदर्भात तीन दिवसाच्या दमदार पावसामुळे ५११ सिंचन प्रकल्पात ५०.४५ टक्के पाणीसाठा साचला आहे. सात विविध प्रकल्पांची २६ दारे उघडण्यात आली असून, त्यातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने अनेक नद्या दुथडी वाहत आहेत.
विशेषत: पश्चिम विदर्भातील २५ मध्यम प्रकल्पांत २५ जुलै रोजीच्या जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, ५७.९३ टक्के पाणीसाठा साचला आहे. नऊ मोठ्या प्रकल्पात सरासरी ५५.४१ टक्के पाणीसाठा साचला आहे. ४७७ लघु प्रकल्पात मात्र ३९.६६ टक्के पाणीसाठा आहे. ५११ प्रकल्पाची संकल्पीय उपयुक्त पाणीसाठा हा ३२८३.६० दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा हा १६५६.६२ दलघमी आहे. त्याची सरासरी टक्केवारी ही ५०.४५ टक्के ऐवढी आहे. २५ ते २८ जुलै दरम्यान विदर्भात बरेच ठिकाणी बरेच ठिकाणी पाऊस राहणार असून, यवतमाळ जिल्ह्यात आजपासून पावसाच्या प्रमाण कमी राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी व्यक्त केला.
बॉक्स
नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती
अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारा उर्ध्व वर्धा प्रकल्पात ५४.३९ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यतील पूस प्रकल्पात सर्वाधिक १०० टक्के, अरुणावती ६६.५२ टक्के, बेंबळा ६६.८९ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ६२.९६ टक्के, वान ४६.२७ टक्के, बुलडाणा जिल्ह्यतील नळगंगा प्रकल्पात २८.३८ टक्के, पेनटाकळी ३२.९५ टक्के, खडकपूर्णा १०.७४ टक्के पाणीसाठा आहे.