आपत्ती व्यवस्थापन : चारघड, पूर्णेसाठी उपाययोजनासुरेश सवळे चांदूरबाजारसन २०१४ च्या २७ जुलै रोजी पूर्णा व चारघड नदीकाठच्या सुमारे १५० गावांना महाप्रलयाचा फटका बसून ३ जीव गेले. हजारो घरांना पुराचा फटका बसला होता. त्यात कोट्यवधींची मालमत्ता नष्ट झाली. या पार्श्वभूमीवर पूर्णा व चारघड नदीकाठच्या गावांना पुराचा धोका संभवतो. जिल्ह्यातील अशा ४८२ पूरप्रवण गावांची यादी जिल्हा प्रशासनाने तयार केली आहे. मागील वर्षी पूर्णा प्रकल्पातून आपत्कालीन परिस्थितीत पाणी सोडण्यात आल्यानंतर ब्राह्मणवाडा थडी, देऊरवाडा, थूगाव, पिंपरी, कुरळ, धानोरा तसेच चारघड हा प्रकल्प आपत्कालीन परिस्थितीत ओव्हरफ्लो होत असल्यामुळे नदीकाठच्या घाटलाडकी, बेलमंडळीसह अनेक गावांमध्ये उद्भवलेल्या पूर संकटाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नैसर्गिक संकटांना सामोरे जाण्यासाठी प्रभावीपणे यंत्रणा सज्ज करणे, याला कायदेशीर महत्त्व प्राप्त झाले आहे. आपत्तीच्या काळात जीवितहानी तसेच वित्तहानी कमी करण्यासाठी पूर्वतयारीवर अधिक भर देण्यात आला आहे.जिल्हा प्रशासनाने शोध व बचावकार्यासाठी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून ३ रबर बोटी खरेदी केल्या आहेत. या नोटींसह जिल्ह्यात २ फायबर बोटी, १२६ लाईफ बॉय रिंग्स, २२२ लाईफ जॅकेट्स इत्यादी साहित्य उपलब्ध आहेत. हे सर्व साहित्य ६ उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अखत्यारित ठेवण्यात आले आहे. बरेचदा दुर्गम भागात पूर आल्यास त्या गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली आल्याने शोध व बचाव कार्यास अडथळा निर्माण होतो, हे लक्षात घेऊन प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरणाचा निर्णय घेतला. नद्या आणि नाल्यांच्या काठावर वसलेल्या ४८२ पूरप्रवण गावांची यादी तयार करण्यात आली आहे. या गावांमध्ये ग्रामआपत्ती निवारण दलाची स्थापना करण्यात आली आहे. या दलात सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, आरोग्यसेवक, कृषी सहायक, स्वस्त धान्य दुकानदार, अंगणवाडी सेविका, गावातील पट्टीचे पोहणाऱ्या ४ ते ६ युवक यांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये लाईफ जॅकेट, मेगा फोन, सर्च लाईट, दोरी हे साहित्य पुरविण्यात आले आहेत.या दलातील सदस्यांना बचाव साहित्याचा वापर करण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यरत राहणार आहे. उपविभागीय स्तरावरही व्यवस्थापन यंत्रणा अस्तित्वात आहे. तालुका आणि गाव पातळीवरही आपत्ती निवारण दल सज्ज असेल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारितील दलात महापालिकेच्या अग्निशमन विभागातील ७, जिल्हा गृहरक्षक दल आणि पोलीस मुख्यालयातील प्रत्येकी ८ शहर पोलीस विभागातील ९, तसेच राज्य राखीव पोलीस दलातील ८ सदस्यांचा समावेश आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १२,२१२ चौ. कि. मी.आहे. वनाखालील क्षेत्र ३,५०२ चौ. कि.मी. आहे. वर्धा नदीने अमरावती आणि वर्धा हे दोन जिल्हे वेगळे केले आहेत. पूर्णा, तापी, चंद्रभागा आणि बेंबळा या जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. याशिवाय धरणांमधून पाणी सोडण्यात आल्यानंतरही बिकट स्थिती निर्माण होते. २००७ मध्ये अतिवृष्टीनंतर जिल्ह्यातील अनेक भागात हाहाकार माजला होता.
४८२ गावे पूरप्रवण प्रशासन सज्ज
By admin | Updated: June 23, 2015 00:51 IST