पान २ ची बॉटम
अंगारमुक्त जंगल जनजागृती अभियान : आदिवासींकडून सहकार्य
परतवाडा : मेळघाटातील जंगलांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आगीच्या घटना पाहता, त्यावर नियंत्रण राखण्याच्या भूमिकेतून सात जणांच्या पथकाने २४० गावे पायाखाली घातली. ३० दिवसांमध्ये तब्बल ९ हजार ३३५ किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. जागतिक वनदिनानिमित्त आदिवासींमध्ये जंगलातील वणवा नियंत्रणासाठी मदत करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
जंगलात वणवा ही समस्या खूप मोठी झाली आहे. ब्राझीलचे ॲमेझॉन, ऑस्ट्रेलियातील लाखो हेक्टर्स जंगल भस्मसात झाले आहे. उन्हाळ्यात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. त्यात मानवनिर्मित आगी भर टाकत आहेत. आगीवर नियंत्रणासाठी, अंगारमुक्त जंगलासाठी आदिवासींमध्ये जनजागृती करणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे लक्षात घेऊन मेळघाट वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक पीयूषा जगताप, वने, वन्यजीव, वनवासी समाज अभ्यासक धनंजय सायरे यांनी लोकसहभाग वाढावा, याकरिता ‘अंगारमुक्त जंगल स्पर्धा’ या उपक्रमाची सुरुवात गतवर्षी केली होती. यावर्षी मेळघाटातील ३२५ गावांत ही मोहीम राबविण्यात आली.
यांचा राहिला सहभाग
अंगारमुक्त जंगल अभियान टीममध्ये पंढरी हेकडे, संतोष शनवारे, नागोराव सोलकर, नागेश धोत्रे, सुरेश सावलकर, सुरेंद्र भासकर हे तरुण सहभागी झाले होते. या सात तरुणांनी आपल्या घरी न जाता सकाळी, दुपार, संध्याकाळ असे रोज प्रत्येकी दोन ते तीन गावे करीत, रात्री मेळघाटातील गावांमध्ये मुक्काम करीत २४० गावे पादाक्रांत केली. याकरिता गावोगावी वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक यांनी निसर्गा फाऊंडेशनच्या या तरुणांना सहकार्य केले. अंगारमुक्त जंगल स्पर्धेची सांगता ही जुलै महिन्यात वन महोत्सवाला केली जाते. तोपर्यंत ही टीम मेळघाट क्षेत्रात कार्यरत असेल.
कोट
अंगारमुक्त जंगल अभियानातून यातून मेळघाटातील जनतेचा सहयोग मिळेल, असा विश्वास आहे. पर्यावरण राखण्याची ही मोहीम आहे. आदिवासी, वन अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.
- धनंजय सायरे, वनवासी अभ्यासक, मेळघाट