भांबेरी : तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण बिट ही संवेदनशील म्हणून ओळखली जात असली तरी या ठिकाणी केवळ एकच जमादार २२ गावांचा कारभार पाहत असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे नागरिकांना आता पोलिसांकडून काहीच अपेक्षा राहिली नाही. पंचगव्हाण बिटमध्ये २२ गावे असल्यामुळे एका पोलिसाचे हे काम नाही. या ठिकाणी बिटचे विभाजन करू न चार कर्मचारी तरी गरजेचे आहे; परंतु एकच जमादार असल्यामुळे २२ गावात कसे जायचे,असा प्रश्न पडत आहे. या परिसरातील सर्व गुन्ह्यांचा तपास या जमादाराकडेच प्रलंबित आहे. नवनवीन गुन्हे घडत असल्यामुळे तक्रारींचा ढीग लागला आहे. काम जास्त आणि कर्मचारी कमी, अशी अवस्था झाल्यामुळे सामान्य लोकांच्या तक्रारींचा निपटारा होण्यात उशीर होत आहे. पोलिसांचे नियंत्रण सुटल्यामुळे गावोगावात अवैध धंद्यांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. भांबेरीसारख्या संवेदनशील गावातून गावकर्यांनी दारू हद्दपार केली होती; मात्र आता आलेल्या ठाणेदाराचा वचक नसल्यामुळे पुन्हा दारू विक्री सुरू झाली आहे.
२२ गावांची सुरक्षा एका जमादारावर
By admin | Updated: August 12, 2014 21:48 IST