वाशिम : जिल्हय़ातील मानोरा तालुका वगळता सर्वच तालुक्यांना वादळी पावसाने बुधवारी रात्री व आज (दि.८) रोजी सकाळी तडाखा दिला. मंगरुळपीर तालुक्यात जिल्हय़ात सर्वाधिक पाऊस पडला. या वादळी पावसामुळे आंबा, भाजीपालावर्गीय पिके व उन्हाळी मूग, भुईमूग पिकांचे नुकसान झाले.गत फेब्रुवारी-मार्चमध्ये वादळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्हय़ात शेतकर्यांची रब्बी पिके भाजीपाला व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या संकटातून सावरत अनेक शेतकर्यांनी त्यांच्या ओलिताच्या शेतात उन्हाळी मूग व भुईमूग पिकांची लागवड केली; परंतु बुधवारी रात्री व आज जिल्हय़ात मंगरुळपीर, कारंजा, वाशिम, मालेगाव व रिसोड तालुक्यात वादळी पावसाने हजेरी लावली.कारंजा तालुक्यात बुधवारी रात्री ७ ते ९ वाजताच्या दरम्यान व आज सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत पाऊस पडला. मंगरुळपीर तालुक्यात बुधवारी उत्तररात्री २.३0 वाजतापासून आज सकाळी ८.३0 वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. वाशिम व मालेगाव तालुक्यात आज सकाळी ६ ते ८.३0 वाजताच्या दरम्यान जोरदार पाऊस पडला. रिसोड तालुक्यात तुरळक स्वरूपाचा रिमझिम -रिमझिम असा पाऊस सकाळी ७.१५ ते ९.३0 वाजताच्या दरम्यान पडला.
वाशिम जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा
By admin | Updated: May 9, 2014 00:55 IST