देवानंद आग्रे
रोहनखेड : अकोट तालुक्यातील कुटासा, बांबर्डा, रोहनखेड परिसरात सद्य:स्थितीत पिके बहरली आहेत. पिकांमध्ये वन्यप्राणी धुमाकूळ घालीत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन्यप्राणी पिके फस्त करीत असल्याने शेतकरी चिंतित आहे. पिके वाचविण्यासाठी काही शेतकरी रात्री शेतातच मुक्काम करीत असल्याचे चित्र रोहनखेड परिसरात दिसून येत आहे.
परिसरात पावसाने उशिरा हजेरी लावल्याने पेरणी उशिरा झाली. सध्या चांगला पाऊस बरसत असल्याने शेतात पिके बहरली आहेत, तसेच काही शेतकरी दुबार पेरणी करीत आहेत. अशातच दिवसभर काम करूनही शेतकऱ्यांना रात्री जागरण करावे लागत असल्याचे चित्र आहे. परिसरात पिके कोवळी असून, वन्यप्राणी शेतात शिरून नासधूस करीत असल्याचे चित्र आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी रात्रीच्या सुमारास शेतात मुक्काम करून पिकांचे संरक्षण करीत असल्याचे चित्र आहे.
---------------------
वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला असून, ते शेतात उगवलेले बियाणे फस्त करीत आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत द्यावी. पिकाला वाचवण्यासाठी शेतात रात्रीचे जागरण करावे लागत आहे.
-ज्ञानेश्वर विजय झामरे, शेतकरी रोहनखेड
-----------------
रात्रीचा हैदोस वाढला
परिसरात पाऊस चांगला बरसत असल्याने पिके बहरली आहेत. वन्यप्राणी शेतात हैदोस घालून पिकांचे नुकसान करीत आहेत. रात्रीच्या सुमारास वन्यप्राण्यांचे कळप शेतात जात असल्याने शेतकरी शेतात मुक्काम करीत आहेत.
-------------------
शेतकऱ्यांचा जीव धोक्यात
रात्रीच्या सुमारास शेतकरी राखणीला जात असल्याने शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या सुमारास सरपटणारे प्राणी, रानडुक्कर यांचा धोका अधिक आहे. त्यामुळे वन विभागाने याकडे लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.