खेट्री: पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील वार्ड क्रमांक ४ मधील गत आठवडाभरापासून पाणीपुरवठा ठप्प असून, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. याकडे ग्रामपंचायतकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पिंपळखुटा येथे वार्ड क्रमांक ४ मधील ग्रामस्थांना एका शासकीय विहिरीवरून पाणीपुरवठा नियमित केला जात होता. मात्र, गेल्या आठवडाभरापासून वार्ड क्रमांक ४ मधील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ग्रामस्थ व महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. आठवडाभरापासून ठप्प झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, नागरिकांची समस्या लक्षात घेत, गावातील सामाजिक कार्यकर्ता आरेफ पठाण यांनी पुढाकार घेऊन टँकरद्वारे ग्रामस्थांना मोफत पाणीपुरवठा करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच सरपंच अल्का सुभाष वाहोकार यांनी सरपंचपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे ग्रामस्थांना आशा होती. मात्र, ग्रामस्थांची निराशा झाली आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (फोटो)
प्रतिक्रिया
विद्युत पुरवठा कमी दाबाचा मिळत असल्याने पाणी जलकुंभात पोहोचत नाही. विद्युत पुरवठा कमी दाबाचा मिळत असल्याबाबत महावितरण विभागांना माहिती दिली आहे.
-अल्का सुभाष वाहोकार, सरपंच पिंपळखुटा.
प्रतिक्रिया
वार्ड क्रमांक ४ मध्ये हेतुपुरस्सर ग्रामपंचायतकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्यास टाळाटाळ केली जात आहे. संबंधित वरिष्ठांनी दखल घेणे गरजेचे आहे.
- शिवलाल वासुदेव कवळे, ग्रामस्थ, वार्ड क्र. ४ पिंपळखुटा.