अकोला : पावसाच्या पाण्याचे संचयन शास्त्रीय पद्धतीने व्हावे, या उदात्त हेतूने अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत वॉटर कप राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत ८ एप्रिलपासून सुरुवात झाली असून, यामध्ये जिल्ह्यातील १0५ गावे सहभागी झाली आहेत. यापैकी ६७ गावांमध्ये पहिल्याच दिवशी श्रमदान करण्यात येऊन विविध प्रकारची कामे करण्यात आली. प्रत्येक गावात पाणलोट व्यवस्थापनाच्या वैज्ञानिक पद्धती वापरून पावसाचे पाणी साठवले पाहिजे, या हेतूने सत्यमेव जयते वॉटर कपचे आयोजन पाणी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. हा कप म्हणजे स्पर्धेच्या काळात जलसंवर्धन आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करण्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये लावलेली शर्यत होय. पाणी फाउंडेशनच्या वतीने स्पर्धेत सहभागी झालेल्या गावातील लोकांना अमरावती जिल्ह्यातील पोरगव्हाण येथे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण घेऊन आलेल्या लोकांनी आपापल्या गावांमध्ये मोहिमेचे काम सुरूसुद्धा केले आहे. प्रशिक्षित व्यक्ती पावसाचे पाणी साठविण्यासाठी काय आवश्यक आहे, त्यासाठी काय करण्याची गरज आहे, हे पटवून देत आहेत. या मोहिमेच्या दुसर्या सत्राचा कालावधी ८ एप्रिल २0१७ ते २३ मे २0१७ असा आहे.पातूर तालुक्यातील ३५ गावांनी सहभाग घेतला आहे. यापैकी २0 गावांमध्ये पहिल्याच दिवशी श्रमदान करण्यात आले. शिर्ला गावात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, आमदार बळीराम सिरस्कार आदींनी प्रत्यक्ष श्रमदान करून स्पर्धेचे उद्घाटन केले. विशेष म्हणजे, शिर्ला येथे युवकांनी रात्री १२ वाजून १ मिनिटाने श्रमदानास प्रारंभ केला. पातूर तालुक्यातील चारमोळी येथील ८00 ग्रामस्थांनी एकाच वेळी तर अंधारसांगवी येथे ३५, मळसूर येथे ३५, सुकळी ३५, जांभरुण येथे ५0, बेलुरा बु. येथे २५ ग्रामस्थांनी श्रमदान केले. यामध्ये विविध कामे करण्यात आली.
१0५ गावांमध्ये वॉटर कप स्पर्धा सुरू!
By admin | Updated: April 9, 2017 01:20 IST