मूर्तिजापूर: गतवर्षी अतवृष्टीमुळे तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर येऊन त्यात अनेक शेतकर्यांची शेतजमीन पिकांसह खरवडून गेली होती. या प्रकाराला दहा महिन्यांचा कालावधी लोटला असला, तरी अजूनही अनेक पूरपीडितांना शासकीय मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
गतवर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात अतवृष्टी होऊन तालुक्यातील नदी-नाल्यांना मोठा पूर आला होता. या पुरामुळे नदी व नाल्यांच्या काठावरील शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. पूर्णा नदीकाठावर शेत असणार्यांचे यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले होते. त्यामुळे शासकीय यंत्रणेकडून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली व पूरग्रस्त शेतकर्यांना मदत वाटपाचे आदेशही निर्गमित करण्यात आले होते. पालक मंत्र्यांनीही पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता. तालुका प्रशासनाला पूरपीडितांना वाटप करावयाचे अनुदान चार ते पाच महिन्यांपूर्वीच मिळाल्याची माहिती आहे. दप्तर दिरंगाईमुळे गतवर्षी पावसाळय़ात नुकसान झालेले शेतकरी या वर्षीचा पावसाळा सुरू झाल्यानंतरही शासकीय मदतीपासून वंचित असल्याचे चित्र आहे. चालू वर्षात गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना अवघ्या दोन महिन्यात शासकीय मदत मिळाली; परंतु गतवर्षीच्या पूरपीडितांना अद्यापपर्यंत मदत मिळालेली नसल्यामुळे शासनाच्या धोरणात असा विरोधाभास का, असा प्रश्न शेतकर्यांकडून उपस्थित केला जात आहे. शेतकर्यांनी खरीपपूर्व मशागतीला प्रारंभ केला असून, बी-बियाण्यांच्या खरेदीसाठी त्यांना पैशांची गरज आहे. या गरजेच्या काळात तरी शासनाने पूरपीडितांना मदत जारी करावी, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
(तालुका प्रतिनिधी) गतवर्षी पुराची झळ बसलेल्या तालुक्यातील शेतकर्यांसाठी १२ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, त्यापैकी ११ कोटी रुपये शेतकर्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत.
- गजेंद्र मालठाणे,
तहसीलदार, मूर्तिजापूर