अकोला- खारपाणपट्टय़ातील ७६ गावांचा समावेश असलेल्या आकोट ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेची ९ कोटी रुपयांची थकबाकी या योजनेच्या मुळावर उठली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) विभागाने ही योजना चालविण्यास असर्मथता दर्शविली आहे. जिल्हा परिषदेने आहे त्या स्थिती योजना चालविण्यास मनाई केली, तर योजनेंतर्गत येणार्या गावांमध्ये उन्हाळ्य़ापूर्वीच पाणीटंचाई रौद्ररूप घेऊ शकते. अकोला शहराला पाणीटंचाईची झळ पोहोचल्याने वाण प्रकल्पातून शहरापर्यंत पाणी आणण्यासाठी २00४ मध्ये ३२ लाख रुपये खर्च करून जलवाहिनी टाकण्यात आली होती. दुष्काळी परिस्थितीत करण्यात आलेल्या या उपाययोजनेची उपयुक्तता संपल्यानंतर ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, याच जलवाहिनीवर खारपाणपट्टय़ातील गावांनाही पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे ही योजना बंद न करता मजीप्राने पुढे सुरू ठेवावी आणि जिल्हा परिषदेने त्यासाठी निधी द्यावा, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आकोट आणि इतर ८४ गावांसाठी ही योजना पुढे सुरू ठेवण्यात आली. या योजनेंतर्गत पाणीपट्टी वसुलीचे काम जिल्हा परिषदेला करावयाचे होते. प्रत्यक्षात वसुलीकडे दुर्लक्ष झाले आणि जिल्हा परिषदेनेही योजना सुरू ठेवण्यासाठी निधी देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे या योजनेची थकबाकी ९ कोटींच्या घरात पोहोचली आहे. या थकबाकीनेच आता खारपाणपट्टय़ातील ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. मजीपाने ही योजना सुरू ठेवण्यास असर्मथता दर्शविली असून, जिल्हा परिषदेने त्यांच्या थाब्यात घेऊन ही योजना पुढे सुरू ठेवावी, असे पत्र मजीप्राने जिल्हा परिषदेला दिले आहे. यापुढे योजना मजीप्रा चालविणार नाही, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेने ही योजना ताब्यात घेण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.
नऊ कोटींची थकबाकी पळविणार ग्रामस्थांच्या ‘तोंडचे पाणी’!
By admin | Updated: October 30, 2015 01:37 IST