राम देशपांडे / अकोला: रेल्वेमध्ये दरोडा, साहित्य चोरी किंवा महिला छेडखानीची घटना घडल्यास पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी लागत होती. पण, आता ही सुविधा धावत्या प्रवासी गाड्यांमध्ये उपलब्ध झाली असून, १0 जुलैपासून संपूर्ण देशात या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये घडलेल्या दरोड्याच्या, चोरीच्या वा छेडखानीच्या घटनांमधील आरोपींचा शोध घेण्यास रेल्वे पोलीस अपयशी ठरतात. जवळच्या रेल्वे स्थानकावरील जीआरपी किंवा आरपीएफ पोलिसांकडे फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीस तपास सुरू होतो. या प्रक्रियेस लागणार्या वेळेत आरोपी फरार होतात.अशा घटनांसंदर्भात प्रवाशांना धावत्या गाडीमध्येच तक्रार दाखल करता येईल यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील होते. १0 जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यापुढे धावत्या गाडीमध्ये साहित्य चोरी, दरोडा किंवा महिला छेडखानी किंवा इतर कुठलीही अप्रिय घटना घडल्यास, प्रवाशांना तत्काळ त्याच गाडीमध्ये कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ किंवा जीआरपी पोलिसाजवळील तक्रार रजिस्टरमध्ये लेखी फिर्याद दाखल करता येणार आहे. अशा अटीतटीच्या प्रसंगी जीआरपी किंवा आरपीएफ पोलीस उपलब्ध नसल्यास, घटनेची फिर्याद दाखल करून घेण्याचा अधिकार कोच कंडक्टर, कोच अटेंडन्ट व गार्डला देण्यात आला आहे. याकरिता संबंधित अधिकार्यांकडे हिंदी आणि इंग्रजीमध्ये छापील स्वरूपातील एफआयआर अर्ज उपलब्ध राहणार आहेत. संबंधित अधिकारी घटनेची माहिती जवळच्या स्थानकावरील रेल्वे पोलिसांना देतील, आणि त्या आधारे रेल्वे पोलीस सापळा रचतील. सध्याच्या घटकेला आरपीएफ पोलीस १३00 गाड्यांमध्ये व जीआरपी पोलीस २ हजार २00 गाड्यांमध्ये नियमित तपासणी करण्याचे कार्य करीत आहे. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन या माध्यमातून रेल्वे अधिकार्यांनी केले आहे. धावत्या गाडीमध्ये प्रवाशांना तक्रार नोंदविता यावी, ही मागणी गेल्या अनेक वर्षांंपासून रेल्वे प्रशासनाकडे प्रलंबित होती. यासंदर्भात निर्देश प्राप्त झाले असून, भुसावळ मंडळात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आरोपीला तत्काळ अटक करण्यासाठी हे बदल प्रभावी ठरणार असल्याचे भुसावळ येथील मंडळ सुरक्षा अधिकारी विजय नायर यांनी स्पष्ट केले.
प्रवाशांनो, धावत्या गाडीतच दाखल करा तक्रार!
By admin | Updated: July 15, 2015 23:46 IST