मोरगाव सादीजन व हसनापूर भागातील शेतकऱ्यांनी पेरणी केली असून, या भागात १५ ते १६ दिवसांपूर्वी पाऊस पडला व जमिनीत ओल असल्याने व पाऊस येईल या आशेने शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, मूग, उडिद, हायब्रीड आदींची पेरणी केली. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांनी लोकांचे घेणे-देणे, मुलामुलींचे लग्न, शिक्षण, पुढील प्रपंच कसा काय भागवावा, असा प्रश्न पडला आहे.
पावसाने दडी मारल्याने शेतातील पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. पेरणीचा खर्च वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस न आल्यास पिके पूर्णपणे करपून गेल्यास दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही. दुबार पेरणीची वेळ आली तर महागाचे बियाणे व खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना खर्च सहन करावा लागणार आहे. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.