जानेफळ(जि. बुलडाणा),दि. २८: विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या सासरकडील मंडळीने शारीरिक व मानसिक छळ केल्याने त्रस्त झालेल्या विवाहितेने स्वत:ला जाळून घेतले. उपचारादरम्यान २७ ऑगस्टला तिचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या माहेरकडील मंडळीने सदर विवाहितेचे प्रेत येथील पोलीस स्टेशनमध्ये आणले. याप्रकरणी जानेफळ पोलिसांनी २८ ऑगस्टला सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हे दाखल केले.सागर देशमुख या युवतीचा विवाह कळंबेश्वर येथील रामेश्वर रूपराव देशमुख या तरुणाशी झाला होता. लग्न होऊन चार महिने उलटत नाही तोच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या मंडळीने तिला शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. एक वेळ तिला घराबाहेर हाकलूनसुद्धा देण्यात आले होते. याशिवाय तिला बेदम मारहाणसुद्धा केल्या जात होती. या त्रासाला कंटाळून सागर हिने २७ जुलै रोजी स्वत: जाळून घेतले. यात ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी मेहकर येथे आणण्यात आले; मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला बुलडाणा व शेवटी औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. तब्बल एक महिना तिच्यावर उपचार सुरू होते. अखेर २७ ऑगस्ट रोजी सागर हिचा मृत्यू झाला. शव विच्छेदनानंतर सागर हिच्या माहेरच्या मंडळीने तिचा मृतदेह थेट जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये आणला. यावेळी सासरच्या मंडळीं विरुद्ध तक्रार देण्यात आली. मृतकाचे वडील विनायक देशमुख यांच्या फिर्यादीवरून जानेफळ पोलिसांनी पती रामेश्वर देशमुख, सासरा रूपराव देशमुख, सासू कांताबाई देशमुख, चुलत सासरा शंकर देशमुख, यांच्याविरुद्ध कलम ३0६, ४९८,(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जानेफळ पोलीस करीत आहेत.
चारित्र्यावर संशय; विवाहितेने जाळून घेतले!
By admin | Updated: August 28, 2016 23:30 IST