रिसोड (जि. वाशिम) : रिसोड तालुक्यातील भापूर येथील ३५ वर्षीय शेतकर्याने २८ ऑगस्ट रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान या शेतकर्याचा ३0 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. शिवाजी दत्तराव साबळे असे मृतकाचे नाव आहे. भापूर येथील शिवाजी साबळे हे एकत्र कुटुंब पद्धतीनुसार राहत आहेत. त्यांच्या कुटुंबाकडे सात एकर कोरडवाहू शेती असून, शिवाजीच्या नावे ७0 आर जमीन आहे. २0१0-११ मध्ये त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ५0 हजाराचे कर्ज काढले होते. सततची नापिकी आणि कर्ज परतफेडीच्या चिंतेने शिवाजी यांना ग्रासले होते. कर्जाचे पुनर्गठन होण्यासाठी त्यांनी बँक व प्रशासनाचे उंबरठे झिजविले; मात्र पुनर्गठन झाले नाही. त्यातच पावसानेही दडी मारल्याने साबळे कुटुंबीयांची झोप उडाली. कर्ज परतफेड व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेत असताना शिवाजी साबळे यांनी २८ ऑगस्टला स्वत:च्या शेतात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रिसोड येथील खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले होते. उपचारादरम्यान ३0 ऑगस्टला पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, वृद्ध आजोबा असा परिवार आहे. शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी मृतकाच्या कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वन केले आणि संपूर्ण मदत करण्याची ग्वाही दिली.
कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या
By admin | Updated: August 31, 2015 01:34 IST